म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम नौदल कमांडअंतर्गत कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या विनाशिकांची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या सुरक्षेची जबाबदारी अन्य युद्धनौकांवर आली आहे.
अरबी समुद्राच्या सुरक्षेसाठी मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम कमांडची भूमिका महत्त्वाची आहे. पुलावामा हल्ला किंवा अलीकडे पाकिस्तानशी बिघडलेल्या संबंधांवेळी याच कमांडअंतर्गत असलेल्या नौकांनी अरबी समुद्रात सातत्याने गस्त घालत दबदबा निर्माण केला. त्यामध्ये विनाशिकांची भूमिका महत्त्वाची होती. पण याच श्रेणीतील दोन विनाशिकांची दुरुस्ती होत असल्याने अन्य युद्धनौकांवरील जबाबदारी वाढली आहे. पश्चिम कमांडच्या ताफ्यातील 'आयएनएस दिल्ली' ही महत्त्वाची विनाशिका आहे. २० वर्षांपूर्वी ही नौका नौदलाच्या ताफ्यात आली. त्यामुळे आता त्याची दुरुस्ती सुरू झाली आहे. याच श्रेणीतील आयएनएस म्हैसूर व आयएनएस मुंबई या अन्य दोन नौका सध्या गस्तीवर आहेत. पण त्यांचीही लवकरच दुरुस्ती सुरू होणार आहे. यामुळे या श्रेणीतील विनाशिका येत्या काळात कार्यरत नसतील. यासोबतच 'आयएनएस कोलकाता' या दिल्ली श्रेणीतीलच अत्याधुनिक नौकेचीही दुरुस्ती सुरू होत आहे. त्या श्रेणीतील आयएनस कोची व आयएनएस मुंबई या नौका मात्र सुदैवाने कार्यरत आहेत.
अशा दोन महत्त्वाच्या विनाशिकांची दुरुस्ती सुरू होत असल्याने आता पश्चिम कमांडअंतर्गत अरबी समुद्राच्या सुरक्षेची भिस्त तलवार व तेग श्रेणीतील आठ फ्रिगेट्स, ब्रह्मपुत्रा श्रेणीतील तीन फ्रिगेट्स तसेच शिवालिक श्रेणीतील तीन फ्रिगेटवरच आहेत. पश्चिम कमांडअंतर्गत असलेल्या काही पाणबुड्यांचीही सध्या दुरुस्ती सुरू असल्याने या युद्धनौकांची जबाबदारी वाढली आहे.