अ‍ॅपशहर

क्षयरुग्ण कळवा, ५०० रुपये मिळवा

क्षयरोग बरा होऊ शकतो, अशी जनजागृती झाली असली तरीही हा आजार लपवण्याचा सर्वसामान्यांचा कल वाढता आहे. त्यामुळे या आजाराचे वेळीच निदान व्हावे व रुग्णांना क्षयमुक्त होता यावे यासाठी आता राष्ट्रीय क्षयनियंत्रण कार्यक्रमांतर्गत खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांनाच सरकार ५०० रु. मानधन देणार आहे! क्षयरुग्ण कळवा, पाचशे रुपये मिळवा, या योजनेला डॉक्टरांनी प्रतिसाद दिला, तर क्षयरोगाचा बिमोड करणे सोपे होईल, असे सरकारला वाटते.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 22 Feb 2018, 2:00 am
मुंबई : क्षयरोग बरा होऊ शकतो, अशी जनजागृती झाली असली तरीही हा आजार लपवण्याचा सर्वसामान्यांचा कल वाढता आहे. त्यामुळे या आजाराचे वेळीच निदान व्हावे व रुग्णांना क्षयमुक्त होता यावे यासाठी आता राष्ट्रीय क्षयनियंत्रण कार्यक्रमांतर्गत खासगी वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांनाच सरकार ५०० रु. मानधन देणार आहे! क्षयरुग्ण कळवा, पाचशे रुपये मिळवा, या योजनेला डॉक्टरांनी प्रतिसाद दिला, तर क्षयरोगाचा बिमोड करणे सोपे होईल, असे सरकारला वाटते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम report the tuberculosis get 500 rupees
क्षयरुग्ण कळवा, ५०० रुपये मिळवा


खासगी रुग्णालयात वा डॉक्टरांकडे जे रुग्ण क्षयरोगाचे उपचार घेण्यासाठी जातात, त्या रुग्णांची नावे क्षयनियंत्रण कक्षास कळवल्यानंतर डॉक्टरांना प्रत्येक रुग्णामागे पाचशे रुपये असे मानधन देण्यात येणार आहे. ही योजना १ एप्रिलपासून राज्यात लागू होणार आहे. डॉक्टरांप्रमाणेच क्षयरुग्णांनाही पाचशे रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेमुळे नोंदणीकृत या गटामध्ये मोडणारा हा आजाराचे किती रुग्ण राज्यात आहेत, त्यांना वैद्यकीय उपचार मिळतात की नाही हे पाहणे सुलभ होईल, असा या योजनेचा उद्देश आहे. गेल्या वर्षी क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत खासगी रुग्णालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणामध्ये साडेचार ते पाच हजार क्षयरुग्णांची नोंद करण्यात आली. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये येणाऱ्या क्षयरुग्णांची संपूर्ण माहितीची नोंद केली जाते. मात्र सामाजिक दडपणामुळे अनेकदा ही औषधे खासगी रुग्णालयामधून घेण्याकडे कल असतो. महागडी वैद्यकीय उपचारपद्धती व औषधांचा खर्च झेपत नसतानाही क्षयरोग लपवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला जातो. त्यामुळे या रुग्णांची नोंद होत नाही. खासगी वैद्यकीय सेवांमधून उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांना हा आजार बरा होऊ शकतो, हा दिलासा देण्याचे कामही त्यापुढील टप्प्यात समुपदेशकांच्या मदतीने करण्यात येणार असल्याचे क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे सहसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी 'मटा'ला सांगितले.

एमडीआर क्षयरोगावर मात करणे सुलभ

सातत्याने हवामानात जे बदल होत आहेत, त्यामुळे क्षयरोगाचे विषाणू वेगाने पसरतात. अनेकदा रुग्ण औषधांचा कोर्स पूर्ण करत नाही. हा कोर्स पूर्ण न केल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी जे रुग्ण जातात, त्यांची माहिती औषधविक्रेत्यांना ठेवणे बंधनकारक आहे. औषधविक्रेत्यांच्या मदतीने राज्यात किती ठिकाणी क्षयरुग्णांवर उपचार सुरू आहेत, याची एकत्रित माहिती मिळणे सोपे होणार आहे. औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाची समस्या वाढती आहे. त्यामुळे रुग्णांनी औषध घेणे थांबवले वा त्याचा प्रभाव कमी झाला तर एमडीआर टीबी होण्याची शक्यता असते. मुंबईतील अशा रुग्णांना शोधणेही सोपे होणार आहे.

हा आजार बरा होतो...

संसर्गजन्य व विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. संज्योत वानखेडे यांनी क्षयरोगाबद्दल भीती बाळगण्याचे कोणतेच कारण नसल्याचे सांगितले. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास क्षयरोगाचा संसर्ग पटकन होतो. योग्य औषधोपचारपद्धती, सकस आहार, व्यायामाची जोड दिली तर क्षयरोग आटोक्यात राहू शकतो. क्षयरोग वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तो का होतो याची नेमकी कारण समजून उपचार घ्यायला हवे, स्वतःहून सार्वजनिक स्वच्छतेचे निकष पाळल्यास हा आजार बळावत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज