अ‍ॅपशहर

वसतिगृहांवर ‘उपाय’

वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांच्या दयनीय अवस्थेवर तोडगा निघाला आहे.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 19 May 2017, 3:58 am
मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांच्या दयनीय अवस्थेवर तोडगा निघाला आहे. त्यांच्यासाठी नवीन वसतिगृहे संमत झाली असून, यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या नव्या वसतिगृहांमुळे वाढत्या निवासी डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम resident doctors will get new hostels
वसतिगृहांवर ‘उपाय’


निवासी डॉक्टरांसाठीच्या वसतिगृहांचे सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिका रुग्णालयांच्या सहकार्याने ‘मार्ड’ने एक समिती गठित केली होती. या समितीच्या निरीक्षणात वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यासाठी अपुरी जागा, अस्वच्छता, स्वच्छतागृहांचा अभाव, शुद्ध व स्वच्छ पाण्याची वानवा असे अनेक प्रश्न पुढे आले. अनेक वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यावर गांभीर्याने विचार करून लोकमान्य टिळक, नायर, कूपर, केईएम रुग्णालयांतील डॉक्टरांच्या वसतिगृहांना जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. पैकी केईएमला अकवर्थ रुग्णालय परिसरात जागा मंजूर झाली आहे. सायन कोळीवाडा, हाजीअली, टाटा कमाऊंडमध्येही या निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यातील काही जागा नव्या शहरनियोजन आराखड्यातील आवश्यक बाबींनुसार नोंदवण्यात आल्या आहेत. पालिकेच्या काही शाळा तसेच कम्युनिटी जागांसह बीपीटीच्या जागेवरही डॉक्टरांच्या निवासासाठी तरतूद करता येईल का, यादृष्टीने चाचपणी सुरू आहे.

मुंबईतील पालिका रुग्णालयांमधील अनुभव हा वैद्यकीय क्षेत्रामधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो. लोकसंख्येचा व आजाराचा मोठा रेटा, विविध प्रकारणे हाताळण्यासाठी तसेच निर्णय घेण्यासाठी लागणारे कौशल्य या रुग्णालयांमध्ये मिळत असते. त्यामुळे आता देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडे वैद्यकीय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्या असलेल्या वसतिगृहांमधील जागा ही ७५० विद्यार्थ्यांना सामावून घेणारी आहे, मात्र प्रत्येक वर्षी ही बॅच ८००हून अधिक विद्यार्थ्यांचा आकडा पार करते. अखेरच्या बॅचची परीक्षा आणि नव्या बॅचमधील मुलांची भरती मेच्या मध्यावर होत असल्याने मे, जून आणि जुलैमध्ये वसतिगृहांमध्ये निवासाचा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे सहा महिन्यांत नव्या वसतिगृहांचे काम सुरू करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे पालिका रुग्णसमूहाचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी ‘मटा’ला सांगितले.

डॉक्टरांची अपेक्षा

डागडुजी न झालेल्या जुन्या वसतिगृहांची अवस्था दयनीय आहे. एका खोलीत अनेकांना राहावे लागते. कामाचा प्रचंड ताण असलेल्या निवासी डॉक्टरांना विश्रांतीसाठी स्वच्छ, हवेशीर जागा नसणे हे दुर्देव आहे. नव्या वसतिगृहांमध्ये या बाबी ध्यानात ठेवून काम होईल, अशी अपेक्षा निवासी डॉक्टर व्यक्त करत आहेत.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज