म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
परदेशस्थ प्रवासातून मुंबईसह इतर भागांत करोनाचा संसर्ग वाढल्याने आता व्यवसाय, पर्यटनासाठी समूहाने परदेशी वा देशातंर्गत प्रवासावर निर्बंध आणले जात आहेत. करोनाचा कहर रोखण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतून व्यवसाय वा पर्यटनासाठी परदेशात जाऊ न देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारपासून ३१ मार्चपर्यंत खासगी टुर कंपन्यांकडून होणाऱ्या परदेशी पर्यटनावर निर्बंध आणण्यात आले आहेत.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार पर्यटक, व्यावसायिकांना एकत्रितरित्या प्रवास करता येणार नाही. टुर ऑपरेटरना परदेशी प्रवासासाठी अपवादात्मक स्थितीत परवानगीसाठी मुंबई पोलिस आयुक्तांकडे अर्ज करावा लागेल. परदेशी पर्यटकांमुळे संसर्ग वाढल्याचे लक्षात घेऊन परदेशी पर्यटनावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विमानतळावर पर्यटन, व्यवसायासाठी जाणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. रेल्वे किंवा बसप्रवासावर लक्ष ठेवणे अवघड आहे. मात्र परदेशी पर्यटनासाठी विमानतळ हाच एकमेव पर्याय असल्याने तिथे जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. मार्च, एप्रिल, मे या कालावधीत पर्यटनास मागणी असल्याने त्याचे आगाऊ आरक्षण केले जाते. हे लक्षात घेऊनच परदेशी प्रवासासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या पर्यटनांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले आहे. खासगी टुर ऑपरेटरवर व्यवसाय, पर्यटन किंवा कोणत्याही उद्देशाने सहल आयोजित केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी स्पष्ट केले आहे.