अ‍ॅपशहर

रायगड किल्ल्यासाठी ६०० कोटींचा आराखडा

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत माहितीम टा...

Maharashtra Times 14 Mar 2018, 2:33 am
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 600 crores plan for raigad fort
रायगड किल्ल्यासाठी ६०० कोटींचा आराखडा


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हाधिकारी पातळीवर वर्ग करण्यात आले आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून या किल्ल्याचा विकास करण्यात येईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मंगळवारी विधानपरिषदेत सांगितले.

शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. रायगड किल्ला हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. देशविदेशातील पर्यटकांना येथे आकर्षित करणे आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचविणे या उद्देशाने राज्य सरकारने या किल्ल्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ३१ मार्च २०१७ रोजी या किल्ल्याच्या विकासासाठी ६०६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यातून किल्ला आणि परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पाथवे, लाइट आणि साउंड शो यांसारखी अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. मागील एका वर्षात केंद्रीय पुरातत्त्व खात्यानेही विविध परवानग्या दिल्या आहेत.

रायगडच्या विकासासाठी छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली एक प्राधिकरणही स्थापन करण्यात आले आहे. तसेच या कामांसाठी आवश्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्यामार्फत रायगड किल्ल्याच्या विविध विकास कामांना गती देण्यात येईल, असे पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले. याबाबत काँग्रेसचे भाई जगताप यांनीही काही प्रश्न उपस्थित केले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज