Anuja.chaawathey@timesgroup.com, @anujaacMT,
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदा
मुंबईमध्ये दर काही महिन्यांनी मराठी विरुद्ध गुजराती वाद उसळताना दिसतो. ही दरी मिटवण्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण गरजेची आहे. अनुवादाच्या माध्यमातून सांस्कृतिक देवाणघेवाण होऊ शकते असे मत कायम व्यक्त करण्यात येते. या पार्श्वभूमीवर बडोद्यामध्ये पार पडणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनुवादाची गरज या परिसंवादादरम्यान ज्येष्ठ अनुवादक आणि गुजराती भाषेतील पाच पुस्तके मराठीमध्ये आणणारे प्रकाश भांतब्रेकर यांच्याशी 'महाराष्ट्र टाइम्स'ने संवाद साधला. तेव्हा मराठी-गुजराती तिरस्कार हा राजकारणासाठी काहीतरी मुद्दा जिवंत राहावा म्हणून मुद्दाम निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्यिक किंवा मराठी-गुजराती जनतेमध्ये खऱ्या अर्थाने हा तिरस्कार नाही. लोकांना आजकाल उपदेश नको असतो. कोणतेही साहित्य, कोणताही अनुवाद या माध्यमातून चांगला संदेश जात असतो. मात्र तो पुरेसा नसतो. यामध्ये राजकीय मत प्रबळ होते कारण ते ओरडून सांगितले जाते. साहित्य आणि अनुवादाच्या माध्यमातून जो संदेश दिला जातो तो अतिशय सौम्य पद्धतीचा असतो. राजकीय आवाज जनतेला अधिक उत्तेजित करतो. त्यामुळे अनुवादाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या संदेशाचा फारसा उपयोग होत नाही असे दिसून येते. या दोन्ही समाजांमध्ये खरे तर एवढी तेढ नाही. भावनिक विद्रोहही नाही. वाद केवळ निर्माण केला आहे, असे विवेचन त्यांनी केले.
बडोद्याच्या साहित्य संमेलनात मराठी-गुजराती प्रकाशक सौहार्दाच्या पार्श्वभूमीवर समकालीन साहित्य मराठी आणि गुजराती साहित्यप्रेमींना वाचायला नक्की आवडेल, असे भांतब्रेकर म्हणाले. वाचकवर्ग समकालीन असल्याने समकालीन साहित्याचा अनुवाद झाल्यास त्या माध्यमातून भाषिक संबंध निर्माण होण्यास मदत होईल. नवी पिढी जुने साहित्य फारसे वाचत नाही. त्यामुळे नवीन साहित्यातील प्रवाह, त्यातील विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवल्यास हे भाषिक सौहार्द अधिक वाढेल असे प्रतिपादन त्यांनी केले.