म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या वा प्रत्यारोपण झाल्यानंतर आयुष्य जगू इच्छिणाऱ्या अनेकांना मानसिक पाठिंब्याची गरज असते. मुंबईमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील हृदयप्रत्यारोपण झालेल्या ७० जणांचा 'संवेदना' हा गट एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळ्ये यांनी सुरू केलेल्या या गटामुळे हृदयप्रत्यारोपण झालेले अनेक रुग्ण एकमेकांना भक्कम पाठिंबा देत आहेत.
हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्णांपुढे अनेक आव्हाने असतात, ती केवळ वैद्यकीय स्वरूपाची नसतात. लहान मुलांबाबत पालकांच्या मनातही शंका येतात. मूल शाळेत जाऊ शकेल का, मुलगी असेल तर तिच्या लग्नाचे काय, औषधे किती काळ घ्यायची, मुलांना खेळता येईल का, आहारामध्ये बदल केला तर चालेल का, अशा अनेक प्रकारच्या शंकांनी ते व्याकूळ होतात. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्या रुग्णांच्या मनातही धाकधूक असते. शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यास काय, याची भीती असते. हीच उत्तरे मिळावीत या उद्देशाने 'संवेदना' या आधारगटाची सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दोन तास मुलुंडमधील खासगी रुग्णालयात हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकत्र येतात. मोकळेपणाने डॉक्टरांसह तिथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना मनातील सगळे प्रश्न विचारतात, अशी माहिती डॉ. आशीश गौर यांनी दिली.
'संवेदना'मध्ये तीन वर्षांच्या मुलीपासून ५७ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या अनेक व्यक्ती येतात. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर औषधे सुरू ठेवावी लागतात. त्यांचा खर्च काही हजारांमध्ये असतो. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर हा खर्च काही रुग्णांना झेपत नाही. अशा वेळी 'संवेदना'मधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे रुग्णांचे नातलग जमेल तितकी मदतही करतात. लहान मुलांनाही बळ देण्याचे काम संवेदना परिवार सातत्याने करतो', असं डॉ. अन्वय मुळ्ये आवर्जून सांगतात.
'मॅरेथॉन'चा मानस
रुग्णांना कोणत्याही टप्प्यावर एकटे वाटू नये, त्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळावे यासाठी हा गट कार्यरत आहे. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर एक वर्ष पूर्ण झाले की हा वाढदिवसही येथे अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. लवकरच अवयव प्रत्यारोपण झालेल्या सर्वांना एकत्र घेऊन विशेष मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन करण्याचा 'संवेदना'चा मानस आहे.
माझ्या आठ वर्षांच्या मुलीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक प्रश्न पडायचे. तिचं दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरु होईल ना, ती अभ्यास करू शकेल का, इतर मुलांप्रमाणे वावरू शकेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'संवेदना' गटामध्ये मिळाली. - स्मिता विश्वकर्मा
हृदय प्रत्यारोपणाची गरज असलेल्या वा प्रत्यारोपण झाल्यानंतर आयुष्य जगू इच्छिणाऱ्या अनेकांना मानसिक पाठिंब्याची गरज असते. मुंबईमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील हृदयप्रत्यारोपण झालेल्या ७० जणांचा 'संवेदना' हा गट एखाद्या कुटुंबाप्रमाणेच एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहतो. हृदय प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळ्ये यांनी सुरू केलेल्या या गटामुळे हृदयप्रत्यारोपण झालेले अनेक रुग्ण एकमेकांना भक्कम पाठिंबा देत आहेत.
हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्णांपुढे अनेक आव्हाने असतात, ती केवळ वैद्यकीय स्वरूपाची नसतात. लहान मुलांबाबत पालकांच्या मनातही शंका येतात. मूल शाळेत जाऊ शकेल का, मुलगी असेल तर तिच्या लग्नाचे काय, औषधे किती काळ घ्यायची, मुलांना खेळता येईल का, आहारामध्ये बदल केला तर चालेल का, अशा अनेक प्रकारच्या शंकांनी ते व्याकूळ होतात. हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्या रुग्णांच्या मनातही धाकधूक असते. शस्त्रक्रिया यशस्वी न झाल्यास काय, याची भीती असते. हीच उत्तरे मिळावीत या उद्देशाने 'संवेदना' या आधारगटाची सुरुवात झाली. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी दोन तास मुलुंडमधील खासगी रुग्णालयात हे रुग्ण व त्यांचे नातेवाईक एकत्र येतात. मोकळेपणाने डॉक्टरांसह तिथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्यांना मनातील सगळे प्रश्न विचारतात, अशी माहिती डॉ. आशीश गौर यांनी दिली.
'संवेदना'मध्ये तीन वर्षांच्या मुलीपासून ५७ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या अनेक व्यक्ती येतात. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर औषधे सुरू ठेवावी लागतात. त्यांचा खर्च काही हजारांमध्ये असतो. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर हा खर्च काही रुग्णांना झेपत नाही. अशा वेळी 'संवेदना'मधील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे रुग्णांचे नातलग जमेल तितकी मदतही करतात. लहान मुलांनाही बळ देण्याचे काम संवेदना परिवार सातत्याने करतो', असं डॉ. अन्वय मुळ्ये आवर्जून सांगतात.
'मॅरेथॉन'चा मानस
रुग्णांना कोणत्याही टप्प्यावर एकटे वाटू नये, त्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळावे यासाठी हा गट कार्यरत आहे. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर एक वर्ष पूर्ण झाले की हा वाढदिवसही येथे अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. लवकरच अवयव प्रत्यारोपण झालेल्या सर्वांना एकत्र घेऊन विशेष मॅरेथॉन स्पर्धेचेही आयोजन करण्याचा 'संवेदना'चा मानस आहे.
माझ्या आठ वर्षांच्या मुलीची हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर अनेक प्रश्न पडायचे. तिचं दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरु होईल ना, ती अभ्यास करू शकेल का, इतर मुलांप्रमाणे वावरू शकेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे 'संवेदना' गटामध्ये मिळाली. - स्मिता विश्वकर्मा