अ‍ॅपशहर

हे मीठागरवाले कुठून आले?; मेट्रो कारशेड वादावर संजय राऊतांचा संताप

मुंबई कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील ‘मुंबई मेट्रो ३’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत राज्य सरकारला बुधवारी मोठा धक्का बसला. या प्रकरणी संजय राऊत यांनी केंद्र आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2020, 12:05 pm
मुंबईः ती जमीन महाराष्ट्राची आहे, हे सरकार महाराष्ट्राचं आहे. मग हे मीठागरवाले कुठून आले, असा संतप्त सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay-raut


आरे कॉलनीतून कांजूरमार्गमधील १०२ एकर जमिनीवर हलवून त्याचे कामही सुरू केलेले असताना या जमीन हस्तांतराचा मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा एक ऑक्टोबरचा आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगित केला. पुढील आदेशापर्यंत त्या जमिनीवर मेट्रो कारशेडचे कोणतेही काम करण्यासही न्यायालयाने एमएमआरडीए व दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (डीएमआरसीएल) मनाई केली. संजय राऊत यांनी न्यायालयाच्या या निर्णायावर नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकार व राज्यातील भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

मेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षानं राजकीय केला असून त्यात न्यायालयाने पडू नये आणि ते योग्य आहे. असं सांगतानाच राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. न्यायालय हल्ली कशातही पडत आहे. खालच्या न्यायालयाला डावलून एका खुनी माणसाला वरचं न्यायालय जामीन देते. बेकायदा बांधकाम तोडण्यासंदर्भात कारवाई केली तर सरकारलाच बेकायदेशीर ठरवतात. देशाच्या न्यायव्यवस्थेला आम्ही असं कधी पाहिलं नव्हतं, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Explainer कांजूर मेट्रो कारशेडवरून वाद; काय आहे संपूर्ण प्रकरण?

कांजूरच्या जागेवर कोणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाचा विषय आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी आहे असं सांगतानाच याच जमिनीवर मागील सरकार पोलिसांसाठी, गरिबांसाठी घरं बाधणार होतं. मगं आता ही जमिन सरकारची नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे कोर्टाचे आदेश; आदित्य ठाकरे म्हणतात...


अहंकाराची व्याख्या काय आहे ते एकदा पाहावं लागेल. आरेचं जंगल, प्राणी, निसर्ग वाचवणं यामध्ये कोणता अहंकार आहे. हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. नद्या वाघ, जंगल वाचवा हा तर मोदी सरकारचा कार्यक्रम आहे, असं म्हणत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यानं अशा प्रकारचे निर्णय येत आहेत का अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहे. पण ही लढाऊ चालूच राहील. महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुखः मी समजू शकतो. पण अशाप्रकारे केंद्राच्या हातात असलेल्या यंत्रणा वापरुन महाराष्ट्राला त्रास देणं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही, असा सूचक इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

मेट्रो कारशेडला स्थगिती; फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना दिला 'हा' सल्ला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज