मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणासाठी केंद्रीय यंत्रणांचा होणार वापर हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर या मुद्दयाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे. कारण, महाविकास आघाडीचे शिल्पकार मानले जाणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. संजय राऊत यांना दोन दिवसांपूर्वीच ईडीने (ED) नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार संजय राऊत हे शुक्रवारी दुपारी १२ वाजता दक्षिण मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत. संजय राऊत यांनी सकाळीच ट्विट करून ही माहिती दिली आहे. ईडीने पाठवलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि केंद्रीय तपासयंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी चौकशीला गेल्यानंतर शिवसैनिकांनी 'ईडी'च्या कार्यालयाबाहेर गर्दी करु नये, असे आवाहनही संजय राऊत यांनी ट्विटमधून केले आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आयकर खात्याने नोटीस पाठवली आहे. शरद पवार यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. मला आयकर खात्याने प्रेमपत्र पाठवले आहे. २००४, २००९, २०१४ आणि २०२० मध्ये मी निवडणुकांना उभे राहताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रांमधील माहितीच्या अनुषंगाने मला ईडीने सगळ्या वर्षांसाठीच्या नोटीस आता एकत्र पाठवल्या आहेत. सुदैवाने या सगळ्याची माहिती माझ्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे ती माहिती द्यायला मला काही चिंता नाही, असे शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र, आता आयकर खात्याची ही चौकशी कुठपर्यंत लांबणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
'ईडीने संजय राऊतांना चौकशीला का बोलावले?'
ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती.
'ईडीने संजय राऊतांना चौकशीला का बोलावले?'
ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. या भूखंडांची किंमत साधारण ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली होती.