अ‍ॅपशहर

'मेट्रो ३' दृष्टिपथात; सारिपूतनगर ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार

प्रकल्पातील पहिला टप्पा सारिपूतनगर ते बीकेसी उत्तर (प्राप्तीकर कार्यालय) असा असेल. हा टप्पा नव्या मुदतीनुसार डिसेंबर २०२३मध्ये सुरू केला जाणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प उभा करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रकल्पाला भेट देत विस्तृत पाहणी केली.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 28 Jan 2023, 8:33 am
मुंबई : ‘मेट्रो ३’ मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू होत असताना बहुचर्चित कारशेडचे काम ५५ टक्के पूर्ण झाले आहेत. ही टक्केवारी डिसेंबरपर्यंत जवळपास ४० टक्क्यांच्या आसपास होती हे विशेष. त्यामुळे या प्रकल्पाचा पहिला टप्पा झपाट्याने दृष्टिपथात येताना दिसत असून, मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होण्याकडे पावले पडत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम metro3
'मेट्रो ३' दृष्टिपथात; सारिपूतनगर ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार


मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडण्यासाठी ‘मेट्रो-३’ हा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाला ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ असे म्हटले जाते. उत्तरेला सारिपूतनगर ते दक्षिणेला कफ परेडपर्यंत हा प्रकल्प आहे. प्रकल्पातील पहिला टप्पा सारिपूतनगर ते बीकेसी उत्तर (प्राप्तीकर कार्यालय) असा असेल. हा टप्पा नव्या मुदतीनुसार डिसेंबर २०२३मध्ये सुरू केला जाणार आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प उभा करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी प्रकल्पाला भेट देत विस्तृत पाहणी केली.

या भेटीदरम्यान भिडे व एमएमआरसीच्या उच्चाधिकारी चमूने आरे कारशेडजवळील सारिपूतनगर येथून एमआयडीसी स्थानकांपर्यंत मेट्रो रेल्वेने प्रवास केला. यादरम्यान त्यांनी तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आवश्यक त्या सूचना दिल्या. ‘मेट्रो ३’च्या या पहिल्या टप्प्यात दहा स्थानकांचा समावेश असेल. त्यातील ही तीन स्थानके अंतर्गत सजावटीच्या कामांखेरीज जवळपास पूर्ण झाली आहेत. आरे कारशेड हा ‘मेट्रो ३’ प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यासंबंधीच्या न्यायिक वादामुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. पण आता मात्र कारशेडचे काम झपाट्याने सुरू झाले आहे. हे काम ५५ टक्के पूर्ण झाल्याचे या दौऱ्यादरम्यान स्पष्ट झाले. त्यामध्ये गाड्या देखरेखीची कार्यशाळा व नियंत्रण इमारत, गाड्या कारशेडपर्यंत आणण्यासाठीचे रूळ यांची कामे झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहेत. ही मार्गिका सारिपूतनगरपर्यंत भूमिगत असेल. तेथून ती जमिनीच्या वर येऊन गाड्या पुढे कारशेडमध्ये देखभालीसाठी जातील. त्यासाठी सारिपूतनगर येथे वळणदार मार्ग तयार करण्यात आला असून त्याचे काम पूर्ण झाले आहे.

डिसेंबरपर्यंत कारशेड होणारच

कारशेडवरुन झालेल्या वादामुळे या मार्गिकेला वर्षभराचा विलंब झाला आहे. या स्थितीत डिसेंबर २०२३ पर्यंत मार्गिका सुरू होताना कारशेड उभे नसल्यास, त्यातील सर्वाधिक गरजेचे नियंत्रण कक्ष बीकेसी येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मात्र काम जलदगतीने होत असल्याने डिसेंबर २०२३ पर्यंत कारशेडदेखील पूर्ण केला जाणार आहे. ‘कारशेडला विलंब झाला असला, तरी पहिला टप्पा व कारशेड एकत्रितच सुरू व्हावे आणि कारशेडमधील सर्व सुविधा तोपर्यंत उभ्या राहाव्यात हे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे’, असे अश्विनी भिडे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

महत्वाचे लेख