मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
‘तुझे आईवडील घरी तुझा अभ्यास घेऊ शकत नाहीत. त्यामुळं तू आमच्या शाळेत पाचवीसाठी प्रवेश घेऊ शकत नाही,’ असं सांगत मुंबईतील अंधेरी येथील ‘श्री सत्य साई विद्यामंदिर’ शाळेनं एका मुलीला शाळेतून काढलं आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
इंग्रजी दैनिक ‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार स्वाती कांबळे ही दहा वर्षाची विद्यार्थिनी अंधेरी येथील ‘श्री सत्य साई विद्यामंदिर’ शाळेत शिकते. गेल्या आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर स्वाती पाचवीच्या वर्गात बसण्यासाठी शाळेत पोहोचली. मात्र, शाळा व्यवस्थापनाने तिला वर्गात बसण्यापासून रोखले. ‘चौथीच्या परीक्षेत तू अनुत्तीर्ण झाली आहेस. शिवाय, तुझे पालक घरी अभ्यास करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळं तुला शाळेतून काढण्यात आलं आहे,’ असं शाळेकडून सांगण्यात आलं. या घटनेनं स्वातीला धक्काच बसला. शाळेच्या या निर्णयावर स्वातीच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्वातीच्या वडलांना अपघात झाला असून ते कमवू शकत नाहीत. तिची आई घरकाम करून कसेबसे घर चालवते. ते दोघेही चौथीपर्यंत शिकलेले आहेत. स्वातीच्या दाखल्यावरील शेरा आणि शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तिला काढून टाकल्यानं इतर शाळेत प्रवेश मिळणंही कठीण झालं आहे. त्यामुळं तिचे आईवडील चिंतेत आहेत.
शाळा म्हणते, आम्ही योग्यच!
शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता परब यांनी मात्र शाळेची बाजू लावून धरली. ‘आमच्या शाळेत स्वाती एकटीच गरीब विद्यार्थिनी आहे असं नाही. इतरही विद्यार्थी-विद्यार्थिनी गरीब आहेत. पण ते घरी अभ्यास करून येतात. स्वाती मात्र अभ्यास करत नाही. आमची शाळा खासगी आहे. त्यामुळं आम्हाला ‘रिझल्ट’कडेही लक्ष द्यावं लागतं. स्वातीच्या पालकांना वेळोवेळी कळवूनही ते कधीही शाळेत आले नाहीत आणि आता ओरड करताहेत,’ असं परब यांनी सांगितलं.
हे तर शिक्षण हक्काचे उल्लंघन!
‘शाळेनं अशा प्रकारे एखाद्या विद्यार्थ्याला आठवीच्या आधीच शाळेतून बाहेर काढणं म्हणजे शिक्षणाच्या हक्काचे उल्लंघन असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकारी प्रकाश चराटे यांनी सांगितले. ‘एखादा विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासात मागे पडत असेल तर त्यांच्यासाठी शाळेनं उपाय शोधला पाहिजे. मात्र त्या विद्यार्थ्यांना ८वी आधी शाळेतून बाहेर काढता येणार नाही, असंही ते म्हणाले.
‘तुझे आईवडील घरी तुझा अभ्यास घेऊ शकत नाहीत. त्यामुळं तू आमच्या शाळेत पाचवीसाठी प्रवेश घेऊ शकत नाही,’ असं सांगत मुंबईतील अंधेरी येथील ‘श्री सत्य साई विद्यामंदिर’ शाळेनं एका मुलीला शाळेतून काढलं आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
इंग्रजी दैनिक ‘मिड डे’नं दिलेल्या वृत्तानुसार स्वाती कांबळे ही दहा वर्षाची विद्यार्थिनी अंधेरी येथील ‘श्री सत्य साई विद्यामंदिर’ शाळेत शिकते. गेल्या आठवड्यात शाळा सुरू झाल्यानंतर स्वाती पाचवीच्या वर्गात बसण्यासाठी शाळेत पोहोचली. मात्र, शाळा व्यवस्थापनाने तिला वर्गात बसण्यापासून रोखले. ‘चौथीच्या परीक्षेत तू अनुत्तीर्ण झाली आहेस. शिवाय, तुझे पालक घरी अभ्यास करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळं तुला शाळेतून काढण्यात आलं आहे,’ असं शाळेकडून सांगण्यात आलं. या घटनेनं स्वातीला धक्काच बसला. शाळेच्या या निर्णयावर स्वातीच्या पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
स्वातीच्या वडलांना अपघात झाला असून ते कमवू शकत नाहीत. तिची आई घरकाम करून कसेबसे घर चालवते. ते दोघेही चौथीपर्यंत शिकलेले आहेत. स्वातीच्या दाखल्यावरील शेरा आणि शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तिला काढून टाकल्यानं इतर शाळेत प्रवेश मिळणंही कठीण झालं आहे. त्यामुळं तिचे आईवडील चिंतेत आहेत.
शाळा म्हणते, आम्ही योग्यच!
शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता परब यांनी मात्र शाळेची बाजू लावून धरली. ‘आमच्या शाळेत स्वाती एकटीच गरीब विद्यार्थिनी आहे असं नाही. इतरही विद्यार्थी-विद्यार्थिनी गरीब आहेत. पण ते घरी अभ्यास करून येतात. स्वाती मात्र अभ्यास करत नाही. आमची शाळा खासगी आहे. त्यामुळं आम्हाला ‘रिझल्ट’कडेही लक्ष द्यावं लागतं. स्वातीच्या पालकांना वेळोवेळी कळवूनही ते कधीही शाळेत आले नाहीत आणि आता ओरड करताहेत,’ असं परब यांनी सांगितलं.
हे तर शिक्षण हक्काचे उल्लंघन!
‘शाळेनं अशा प्रकारे एखाद्या विद्यार्थ्याला आठवीच्या आधीच शाळेतून बाहेर काढणं म्हणजे शिक्षणाच्या हक्काचे उल्लंघन असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकारी प्रकाश चराटे यांनी सांगितले. ‘एखादा विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासात मागे पडत असेल तर त्यांच्यासाठी शाळेनं उपाय शोधला पाहिजे. मात्र त्या विद्यार्थ्यांना ८वी आधी शाळेतून बाहेर काढता येणार नाही, असंही ते म्हणाले.