अ‍ॅपशहर

ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन

आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Maharashtra Times 2 Sep 2017, 3:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम senior poetess shirish pai dies in mumbai
ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन


आचार्य अत्रे यांच्या कन्या, ज्येष्ठ कवयित्री, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी काव्यक्षेत्रात शिरीष पै यांचं मोठं योगदान असलं, तरी त्यांनी कथा, ललित लेखन, बालसाहित्य, नाटक या प्रांतांतही तितक्याच लीलया संचार केला. लेखनाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला होताच, परंतु त्याला आपल्या शैलीची जोड देत शिरीष पै यांनी मराठी साहित्यात अभिनव प्रयोग केले. हायकु हा अल्पाक्षरी जपानी काव्यप्रकार मराठीत लोकप्रिय करण्याचं श्रेय सर्वार्थाने शिरीष पै यांनाच जातं. त्यांनीच हा काव्यप्रकार मराठीत प्रथम आणला आणि रुजवलाही. त्यात त्यांनी आणलेली तरलता रसिकांना इतकी भावली, की मराठीत काही काळ हायकुंची लाटच आली होती.

एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र हे शिरीष पै यांचे काही गाजलेले काव्यसंग्रह. त्याशिवाय, लालन बैरागीण, हेही दिवस जातील, या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. आजचा दिवस, आतला आवाज, अनुभवांती, प्रियजन हे ललित साहित्य, तसंच चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार या कथासंग्रहांतून शिरीष पै यांच्या लेखनसामर्थ्याची सहज कल्पना येते. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या पुस्तकांमधून त्यांच्या मनाचं माधुर्य प्रतीत होतं. हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही शिरीष पै यांची नाटकंही रसिकांना मोहिनी घालतात.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान १९५६ मध्ये आचार्य अत्रे स्थानबद्ध झाले होते. ते चार महिन्यांनी सुटले. या काळात शिरीष पै यांनी 'नवयुग'ची जबाबदारी अत्यंत कौशल्याने सांभाळली होती. 'पप्पा' आणि 'वडिलांचे सेवेशी' या दोन पुस्तकांमधून त्यांनी आचार्य अत्रे यांचा अफाट जीवनपट उलगडला आहे.

शिरीष पै यांच्या निधनामुळे मराठी काव्यविश्व एका प्रतिभावान, प्रयोगशील कवियित्रीला मुकल्याची भावना व्यक्त होतेय. आज संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज