अ‍ॅपशहर

शरद पवारांच्या पावलावर पाऊल, शिंदेंची बंडखोरी ३ कारणांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं राजकीय बंड पवारांच्या नावावर आहे.. पवारांनी जे बंड केलं ते अपमानास्पद वागणुकीला कंटाळून केलं होतं.. जे कारण एकनाथ शिंदे यांनीही आपल्या बंडखोरीनंतर पुढे केलंय

Authored byविशाल बडे | Edited byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2022, 8:18 pm

हायलाइट्स:

  • पवार आणि शिंदेंच्या बंडात तीन साम्य
  • इतिहास उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारा
  • पवारांनी केलं तेच शिंदेंना जमेल का?
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
मुंबई : शरद पवार वयाच्या ३८ व्या वर्षी बंडखोरी करुन पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ३८ आमदार घेऊन बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना पवारांपेक्षाही जास्त म्हणजे ४० आमदारांचा पाठिंबा होता. या दोन्ही नेत्यांच्या बंडात बरंच साम्य आहे. दोघांनीही आपल्या वरिष्ठ नेत्याला खाली खेचून सत्ता मिळवलीय, आमदार फोडले आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. पण पवार पुढे वजनदार मराठा नेता बनले, चार वेळा मुख्यमंत्री झाले, स्वतःचा पक्ष काढल्यानंतर तर त्यांना केंद्रातल्या सत्तेतही सहभागी होता आलं आणि आज पवार कोण आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा सगळा इतिहास उद्धव ठाकरेंची चिंता वाढवणारा आहे. मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे ठाकरे कुटुंबाची डोकेदुखी कशी वाढवू शकतात आणि पवारांनी केलं तेच एकनाथ शिंदेंना जमेल का? याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं राजकीय बंड पवारांच्या नावावर आहे.. पवारांनी जे बंड केलं ते अपमानास्पद वागणुकीला कंटाळून केलं होतं.. जे कारण एकनाथ शिंदे यांनीही आपल्या बंडखोरीनंतर पुढे केलंय.. पवारांची नाराजी तेव्हा आपल्याच पक्षाविरोधात होती आणि एकनाथ शिंदेंचीही नाराजी स्वतःच्याच पक्षाविरोधात आहे..

काय झालं होतं त्यावेळी?

इंदिरा गांधींनी १९७७ ला आणीबाणी मागे घेण्याची घोषणा केली.. पण या आणीबाणीनंतर काँग्रेस दोन गटात विभागली गेली.. एका काँग्रेसचं नेतृत्व इंदिरा गांधींकडे होतं, तर दुसऱ्या काँग्रेसचं नेतृत्त्व कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री डी देवराज करायचे.. पण महाराष्ट्र विधानसभेच्या १९७८ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे दोन्ही गट वसंतदादा पाटलांच्या नेतृत्त्वात एकत्र आले आणि सत्ता स्थापन केली.. या सरकारला अत्यंत काठावरचं बहुमत मिळालं होतं.. त्यामुळे अस्थिरता तर होतीच.. शरद पवारही तेव्हा वसंतदादा पाटलांच्या सरकारमध्ये मंत्री होते. पण मंत्री असलेल्या पवारांनी १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्राला असा हादरा दिला, जो २१ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी दिला होता.

हेही वाचा : ठाकरेंनी रिक्षावरून टोला दिला; शिंदेंनी थेट मर्सिडिजच काढली; एका वाक्यात प्रत्युत्तर

सर्वात मोठ्या राजकीय बंडाची नोंद

आपल्याकडे स्वतःचे ३८ आणि इतर पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखवणारं पत्र शरद पवारांनी राज्यपालांकडे सादर केलं. याशिवाय मी स्वतःच विधीमंडळ गटनेता आहे आणि त्यासाठी आमदारांचा पाठिंबा आहे हे दाखवणारं पत्रही राज्यपालांना देण्यात आलं. राज्यपालांनी शरद पवारांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय बंडाची नोंद झाली. अपमानास्पद वागणूक हे एकमेव कारण देत पवारांनी अख्खी काँग्रेसच फोडली.

फाईल फोटो


पवारांनी या बंडानंतर काय मिळवलं?

वयाच्या ३८ व्या वर्षी शरद पवार सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले
समांतर काँग्रेस हे सरकार पवारांनी स्थापन केलं
इंदिरा गांधींनी पुन्हा सत्तेत येताच १९८० ला हे सरकार पाडलं
या बंडानंतर शरद पवार प्रभावी मराठा नेता बनले
देशाच्या राजकारणात पवारांच्या बंडाची दखल घेतली गेली
पुढे काँग्रेस एकत्र झाल्यानंतरही पवारांचं राजकीय वजन कायम राहिलं
१९८३ ला पवार समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले
१९८४ ला बारामतीतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले
१९८५ ला पुन्हा विधानसभा लढवून राज्यात परतण्याचा निर्णय घेतला

हेही वाचा : गद्दारांचं विकृत हसू, निष्ठावंतांच्या डोळ्यात अश्रू यातून नक्की मार्ग काढणार : उद्धव ठाकरे

शिवसेनेला रोखण्यासाठी राजीव गांधींनी पवारांना पुन्हा १९८८ ला मुख्यमंत्री केलं
शिवसेना-भाजपला हरवून १९९० ला पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले
राजीव गांधींच्या हत्येनंतर पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही होते, पण संधी हुकली
१९९१ ला पवारांना केंद्रात बोलावण्यात आलं, संरक्षण मंत्रीपद दिलं
मुंबईतील दंगलींनंतर ६ मार्च १९९३ ला पवार परत राज्यात परतले, चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले
१९९५ ला युतीचं सरकार आलं, १९९६ ला पवार लोकसभेवर निवडून गेले
सोनिया गांधींच्या नागरिकत्वावर आक्षेपामुळे पवारांना पक्षातून काढून टाकलं
यानंतर १९९९ ला पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली
राष्ट्रवादीने पुढे पुन्हा काँग्रेससोबत एकत्र येत राज्यात आणि केंद्रातही सत्ता मिळवली

पवारांची ही भली मोठी कारकीर्द यासाठी सांगितली, की ते सुद्धा बंडखोरी करुन स्वतःच्या पक्षाला आव्हान देऊन मुख्यमंत्री झाले होते.. एकनाथ शिंदे हेही आता मुख्यमंत्री झालेत, ५० आमदार त्यांच्या मागे आहेत.. एक मराठा चेहरा, आमदारांमधली लोकप्रियता आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बंडखोरीही त्यांना पवारांसारखी मोठा नेता बनवू शकते का, हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा : ठाकरे म्हणाले रिक्षावाला सुस्साट, फडणवीस म्हणतात, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले...

महत्वाचे लेख