अ‍ॅपशहर

शिंदे-फडणवीस सरकारशी महाविकास आघाडीतील काही माजी मंत्र्यांची जवळीक वाढली? चर्चांना उधाण

Shinde Government News : राज्यात काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारशी महाविकास आघाडीतील काही माजी मंत्र्यांची जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे शिंदे सरकारने काँग्रेसचे माजी मंत्री...

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 30 Oct 2022, 8:04 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : साडेतीन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारशी महाविकास आघाडीतील काही माजी मंत्र्यांची जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे शिंदे सरकारने काँग्रेसचे माजी मंत्री अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजीत कदम, के. सी. पाडवी, प्रा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे. तथापि, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटच्या वर्तुळातील मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eknath shinde devendra fadnavis
शिंदे-फडणवीस सरकारशी महाविकास आघाडीतील काही माजी मंत्र्यांची जवळीक वाढली? चर्चांना उधाण


महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते आणि माजी मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था शिंदे सरकारने अचानक शुक्रवारी रद्द केली. यामुळे विरोधी पक्षातील नेते सरकारवर टीकेची झोड उठवत आहे. मात्र, नव्या सरकारने मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली आहे. त्यातही उद्धव ठाकरे यांचे माजी स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. नार्वेकर यांची सरकार काळजी घेत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मुख्यमंत्र्यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणेशोत्सवात भेट दिली होती.

स्वीय सहायक नार्वेकर यांच्या जागी काही दिवसांपूर्वीच रवी म्हात्रे यांची नेमणूक झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांची सुरक्षा वाढविण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांना सुरक्षा पुरविण्याबाबत गृह खात्याच्या दोन समित्यांमार्फत शहानिशा करून निर्णय घेण्यात येतो. क्रिकेट विश्वातील एमसीएच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते जितेंद्र आव्हाड यांची नव्या सरकारमधील जवळीक लपून राहिली नव्हती. अर्थात राजकारण आणि खेळ या दोन भिन्न गोष्टी असून, त्यांचा परस्परांशी संबंध नाही. क्रिकेटची निवडणूक ही खिलाडूपणाने घ्यायची असते, असे आव्हाड यांना वाटते.

पवारांच्या निकटवर्तीयाला घेरण्यासाठी भाजपची रणनीती? रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीत होणार भूकंप

‘सुरक्षा कपात निर्णयाच्या फेरविचार करा’

‘सामाजिक आणि राजकीय जीवनात जे वावरतात. अशांना मित्रांपेक्षा शत्रूही जास्त असतात. यामुळेच सरकारमार्फत नेत्यांना सुरक्षा पुरविण्यात येते. सत्तांतर झाले. दिवस येत-जात असतात. पण महाराष्ट्र कधी झुकणार नाही. तत्कालीन गृहमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला होता. यामुळे ज्यांची सुरक्षा काढण्यात आली त्याचा सरकारने पुनर्विचार करावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

ठाकरे सरकारची कुंडली मांडणार? प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढणार, उदय सामंत यांचे वक्तव्य

‘ज्यांना सुरक्षेची खरी गरज आहे अशांना द्यावी. आम्ही या निर्णयाबाबत काही आरोप करणार नाही. पण मी गृहमंत्री असताना माझ्यावर हल्ला झाला होता. मला अनेक अडचणी आल्या होत्या. सद्यस्थितीत ज्यांची सुरक्षा काढली, त्याबाबत पुनर्विचार करावा,’ असे म्हणणे भुजबळ यांनी मांडले. नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आपणास तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी सुरक्षा व्यवस्था दिली होती, अशी आठवण भुजबळ यांनी सांगितली. ‘टाटा-एअर बसचा मोठा प्रकल्प शेजारच्या गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प नागपूरला मिहानला होणार होता. प्रकल्प महाराष्ट्रात राहिला असता, तर २२ हजार कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली असती. तरुणांना रोजगार मिळाला असता,’ असेही भुजबळ म्हणाले.

महत्वाचे लेख