अ‍ॅपशहर

'बेफाम मुख्यमंत्री पराभवाने वेडेपिसे होतील!'

मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत. उद्याच्या पराभवानंतर ते पुरते वेडेपिसे होतील. कारण ढोंग व खोटेपणाचा कोथळा मुंबईसह महाराष्ट्राची जनता काढणार आहे. तुम्ही कितीही आपटा, विजय शिवसेनेचाच होणार, अशा शब्दांत सेनेनं मतदानाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.

Maharashtra Times 20 Feb 2017, 8:39 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena attacks devendra fadnavis a day before voting
'बेफाम मुख्यमंत्री पराभवाने वेडेपिसे होतील!'


मुख्यमंत्री बेफाम झाले आहेत. उद्याच्या पराभवानंतर ते पुरते वेडेपिसे होतील. कारण ढोंग व खोटेपणाचा कोथळा मुंबईसह महाराष्ट्राची जनता काढणार आहे. तुम्ही कितीही आपटा, विजय शिवसेनेचाच होणार, अशा शब्दांत सेनेनं मतदानाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.

नरेंद्रभाई आणि देवेंद्र भौना घरबसल्या भरभक्कम मते विकासाच्या मुद्द्यावर मिळायला हवी होती. पण कामाच्या नावाने ‘बोंब’ असल्याने मुख्यमंत्री जेथे जातील तेथे फक्त ‘रिकाम्या’ खुर्च्यांनी स्वागत होत आहे. 'चंबूगबाळे आवरून चालते व्हा' असे आम्ही सरकारला सांगण्याआधीच रिकाम्या खुर्च्यांनी सरकारला नोटीस मारली आहे, असा टोलाही 'सामना'मधून भाजपला लगावण्यात आला आहे.

शिवसेनेने मुंबईतल्या जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप स्वतः बिल्डर‘राज’ वाल्यांनी करावा हा येथील मराठी माणसांचाच अपमान आहे. बिल्डरांबरोबर तुमची फ्रेंडली मॅच सुरू असताना दुसऱ्यांवर असे आरोप करता हे मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकण्यासारखेच आहे. शिवसेनाद्वेषाने पछाडलेल्यांनी इतके कोडगे, बेशरम, निर्लज्ज, तत्त्वशून्य तरी बनू नये, असा बाण त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर सोडला आहे. पन्नास वर्षे मुंबई, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आयुष्य वेचलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या ‘महापौर’ बंगल्यातील स्मारकास विरोध करणाऱया पिचकाऱ्या मारणे, हा तर रक्तपिपासूपणाचा कळस म्हणावा लागेल, असंही त्यांनी राज यांना सुनावलं आहे.

>> जो उठतोय तो अफझलखानी विडा उचलतोय की, मुंबई घेणार म्हणजे घेणारच! जणू काही मुंबई यांच्या बापजाद्यांनी आपले रक्त सांडून मिळवली आहे. आता प्रत्यक्ष बुळबुळीत भाजपवालेही अशा वल्गना करू लागले आहेत याची गंमत वाटते.

>> राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज एक थाप मारत आहेत. त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची ही फक्त शिवसेनेच्या पाठिंब्यावरच टिकून आहे. हे उद्या मुख्यमंत्री म्हणून राहतील की नाही याविषयी अनिश्चितता असतानाही हे महाशय मुंबईचे भवितव्य घडवायला निघाले आहेत व त्यासाठी शिवसेनेकडे डोळे वटारून पाहत आहेत.

>> प्रचारासाठी गल्लीबोळ फिरण्याची वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर यावी, हाच त्यांचा पराभव आहे. मागच्या दोनेक वर्षांत तुम्ही रेटून विकासाची कामे केली म्हणताय ना? ही कामे खरोखरच दिसत असतील तर लोकांसमोर मतांसाठी कटोरा पसरण्याची गरज नाही.

>> पुणे-नाशिकसारख्या शहरात फडणवीसांच्या सभेला 50-100 माणसं नसावीत याचे आम्हाला दुःखच होत आहे. शेवटी मुख्यमंत्रीपदाची ती अप्रतिष्ठा आहे.

>> विधानसभा-लोकसभा निवडणुकीत या बुडबुड्यांना ‘लाट’ असल्याचा भास झाला होता. तो भास आता मुंबई-ठाण्यात, पुणे-नाशकात, विदर्भात संपून जाईल. राज्याची जनता एका चिडीतून मतदानास उतरेल. भंपकपणा आणि खोटारडेपणाचा पर्दाफाश करील.

>> मुख्यमंत्र्यांनी अशी पिचकारी मारली आहे की, मुंबईकरांच्या विकासासाठी शिवसेनेने काय केले? भाजप हा पक्ष महापालिकेवर चालत नाही वगैरे वगैरे. अशी पिचकारी मारणे हे तर खोटारडेपणाचे टोक आहे.

>> शिवसेनेने मुंबईत विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तो डोंगर चढता चढता तुम्हाला धाप लागेल व तुम्ही खाली पडाल.

>> तुमचा पक्ष कुणाच्या पैशावर चालतो ते सध्या मोकाट सुटलेल्या काळय़ा पैशांच्या खऱ्या मालकांना विचारा. मुंबई-पुण्यातील ‘ट्रम्पस्’ टॉवर्स’वाल्यांना आणि
गुंडभरती करून मुंबईचे अंडरवर्ल्ड करू पाहणाऱ्या ‘क्लीन चिट’वाल्यांना विचारा.

>> मुख्यमंत्र्यांनी जाता जाता असे सांगितले की, भ्रष्टाचाऱयांचा आता कोथळा काढू. म्हणजे मंत्रिमंडळातील त्यांच्या भाजप सहकाऱयांच्या रक्तानेच मुख्यमंत्र्यांच्या हातातील सुरा रंगणार काय? भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज