आशीष शेलार यांचा आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
आरेला जंगल घोषित करू असे आश्वासन दिलेल्या शिवसेनेने सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली, त्याच शिवसेनेने आता आरेतील आदिवासी पाडे स्थलांतरित करून हा पट्टा निवासी करून खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी येथे केला.
विधानसभेमध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना शेलार यांनी हा आरोप केला. शिवसेना सदस्य रवींद्र वायकर यांनी आरेमधील आदिवासी पाडे व विविध ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे यांना, आरेमधील एका मोठ्या भूखंडावर विकास आराखड्याअंतर्गत निवासी आरक्षण करून पुनर्विकसित करावे असा मुद्दा मांडला. त्यावरून भाजप आमदार आशीष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर आणि अन्य सदस्यांनी आक्रमकपणे आरेतील भूखंड हडपण्याचा हा डाव असल्याचा आरोप करून शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला.
याबाबत पत्रकारांशी बोलताना आमदार आशीष शेलार म्हणाले की, आरेमध्ये जे आदिवासी पाडे आहेत, येथील लोकांना सोयीसुविधा देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना चांगले रस्ते, पाणी, वीज, आरोग्याच्या सोयीसुविधा, पक्की घरे मिळालीच पाहिजेत, सोबत त्यांच्या संस्कृती व कलेचे जतनही झाले पाहिजे. मात्र आदिवासींच्या नावावर, त्यांना स्थलांतरीत करून त्यांच्या जमिनी विकासकांना देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल, तर तो आम्ही हाणून पाडू. मुंबईकरांसाठी आवश्यक असणाऱ्या मेट्रो कारशेडचे काम ज्या शिवसेनेने बंद पडले, त्या शिवसेनेचे सदस्य आरेतील भूखंड निवासी करा, अशी मागणी करीत आहेत. हा आरेतील भूखंड खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असेलस तर तो आम्ही हाणून पाडू, असा इशाराही आमदार आशीष शेलार यांनी दिला.
कोळीवाड्यातील घरांना वीजमीटर
मुंबईतील कोळीवाड्यातील पहिल्या मजल्यावरील घरांना वीज मिटर द्या, अशी मागणीही शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करतानाच विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करून सरकारचे या मागणीकडे लक्षही वेधले.