म. टा. प्रतिनिधी, मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज यांची दैदिप्यमान कारकीर्द, त्यांची तत्त्वे, विचारसरणी, वागणूक या गोष्टी आजच्या पिढीलाही मोहवतात. 'जय शिवराय' म्हणताना त्यांना अभिमान वाटतो. शिवरायांच्या या कारकीर्दीचा आढावा शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव या कार्यक्रमातून घेण्यात येतो. रविवार २७ मे रोजी सायं. ६ वाजता बोरिवली पश्चिम येथे ज्ञानसागर अॅम्फि थिएटरमध्ये हा कार्यक्रम सादर होणार आहे.
साईशा फाऊंडेशनच्या माध्यमातून बोरिवली सांकृतिक केंद्र व हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर यांच्या संयुक्त विद्यमाने हा दृक-श्राव्य कार्यक्रम कार्यक्रम होईल. यामध्ये चाळीस कलाकार सहभागी होतील. शिवपूर्वकालीन कालखंडापासून, शिवकालीन कालखंडाच्या बरोबर छत्रपतींच्या दूरदृष्टीबद्दलच्या माहितीचा यात समावेश असेल. तत्कालिन युद्धकौशल्याची प्रात्यक्षिकेही यात सादर होतील. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य, तत्कालिन योद्ध्यांची शौर्यगाथा यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील गीते अजित नलावडे यांच्या लेखणीतून साकारली असून निवेदन पद्मश्री राव यांचे आहे. यावेळी खास आकर्षण म्हणजे बाजी प्रभू देशपांडे यांचे वंशज कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे. या कार्यक्रमासाठी मटा कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी काही जागा राखीव आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९१६७७११६४९ (सकाळी ११ ते सायं. ७)
स्थळ : ज्ञान सागर अॅम्फिथिएटर, ब्रह्मकुमारी गार्डनच्या मागे, देविदास रोड, बोरिवली पश्चिम
रविवार २७ मे, सायं. ६ वाजता