अ‍ॅपशहर

आमच्या बँकेत १५ लाख कधी येणार?: सेना

'निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा?’ असं कुणी विचारल्यास त्याला मारणार, जाळणार की धरणार,' असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' जाळण्याचा इशारा देणाऱ्या मुंबईतील भाजप नेत्यांना केला आहे.

Maharashtra Times 28 Jun 2016, 10:38 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena again slams bjp
आमच्या बँकेत १५ लाख कधी येणार?: सेना


'निवडणुकीपूर्वी वचन दिल्याप्रमाणे आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा?’ असं कुणी विचारल्यास त्याला मारणार, जाळणार की धरणार,' असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' जाळण्याचा इशारा देणाऱ्या मुंबईतील भाजप नेत्यांना केला आहे.

शिवसैनिकांनी 'मनोगत'चे अंक जाळल्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी 'सामना' जाळण्याची भाषा केली होती. शेलार यांची ही टीका उद्धव यांच्या फारच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी 'सामना'तील अग्रलेखातून उद्धव यांनी शेलार यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. मोदींच्या 'मन की बात'च्या निमित्तानं उद्धव यांनी ही संधी साधली आहे. 'मन की बात' लोकांना ऐकता यावी यासाठी मुंबई भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी फुकट चहापाण्याची व्यवस्था केली होती. तोच धागा पकडून उद्धव यांनी भाजपवाल्यांना टोले हाणले आहेत. 'मोदी यांची ‘मन की बात’ कडक चायप्रमाणे आहे. देश बदलत आहे, पण आम्हाला फुकट चहा नको. आमच्या बँकेत पंधरा लाख रुपये कधी जमा करताय ते सांगा?’ असं एखाद्या तिरपागड्यानं विचारलं तर काय करावं? त्यास मारावं, जाळावं की धरावं असा प्रश्‍न काहींना पडू शकतो. चायपेक्षा किटली गरम म्हणतात ते यालाच,' अशी टीका उद्धव यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणतात...

> पंतप्रधान मोदी यांच्या अजेंड्यावर काळ्या पैशांची ‘वापसी’ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी ते व अर्थमंत्री जेटली शर्थ करीत आहेत. परदेशात दडवलेल्या काळ्या पैशाबाबत रामदेवबाबा यांच्यासारख्या मंडळींनीही आंदोलने, उपोषणे केलीच होती; पण आतापर्यंत किती काळा पैसा मायदेशी परत आला, याबाबत कुणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही.

> निवडणुकीपूर्वी मोदी यांनी सांगितले होते की, परदेशी बँकांत दीड-दोन लाख कोटी रुपयांचा काळा पैसा दडवून ठेवला आहे. सत्तेवर येताच हा सर्व पैसा परत येईल. प्रत्येक हिंदुस्थानीच्या बँक खात्यावर किमान पंधरा लाख जमा होतील. दोन वर्षांनंतर नक्की किती काळे धन देशात आले व किती देशवासीयांच्या बँक खात्यांत पंधरा लाख जमा झाले?

> १५ लाखांचा जाब विचारणाऱ्यांना ‘चोख’ उत्तर देण्यासाठी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनाही रेडिओवर पाठवायला हवे. म्हणजे सरकारवर टीका करणार्‍यांच्या जिभा हासडता येतील काय किंवा त्यांना जाळून मारता येईल काय? तेसुद्धा त्यांना ठरवावे लागेल.

> हरयाणातील काँग्रेस आमदारांची १४ मते एकाच वेळी बाद होऊ शकतात हा चमत्कार काळ्या पैशांचा आहे. तामीळनाडूसारख्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी पैशांचे वाटप झाले. ते पाहता काळा पैसा शोधण्यासाठी स्वित्झर्लंड किंवा मॉरिशसला पोहोचण्याची गरज नाही.

> बिहार आणि त्याआधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जो पैशांचा पाऊस पडला तो काही आकाशातील इंद्र देवाचा प्रताप नव्हता. राजकीय कुबेरांनीच त्यांच्या लपवलेल्या तिजोर्‍या उघडल्या होत्या. त्यामुळे काळा पैसा आपल्या देशातच आहे. तो उकरून काढला तरी पंतप्रधान मोदी यांचे मिशन सफल होईल.

> मोदी यांनी स्वदेशातील धनिकांना, व्यापार्‍यांना, राजकारण्यांना आवाहन केले, काळा पैसा बाहेर काढा व पवित्र व्हा! ‘‘मी भाजपच्या खासदारांनाही हाच सल्ला दिला आहे,’’ असेही मोदी यांनी स्पष्ट केले. त्यामागचे भाव समजू शकत नाहीत.

> पंतप्रधान मोदी ५० वर्षांची घाण साफ करीत आहेत. त्यांच्या हातात छडी जरूर आहे, पण ती जादूची छडी नाही. त्यामुळे फक्त दोन वर्षांत सर्व काही बदलून जाईल ही अपेक्षा ठेवू नका. मात्र एखादा तिरपागडा सत्य बोलतो म्हणून त्यास मारावे, जाळावे असे बोलणे हे काही आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळे मोदी यांचीच बदनामी होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज