अ‍ॅपशहर

शिवसेना-भाजप युतीवरचे प्रश्नचिन्ह कायम

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतल्या जागावाटपासंदर्भातली शिवसेना आणि भाजपामधली तिसरी बैठकही आज कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली. भाजपने ११४ तर शिवसेनेने ६० जागांचा प्रस्ताव या बैठकीत दिला. परिणामी मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपात युती होणार की नाही याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

Maharashtra Times 21 Jan 2017, 7:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena bjp alliance talks during round three also ended inconclusively
शिवसेना-भाजप युतीवरचे प्रश्नचिन्ह कायम


मुंबई महानगरपालिका निवडणुकीतल्या जागावाटपासंदर्भातली शिवसेना आणि भाजपामधली तिसरी बैठकही आज कोणताही सकारात्मक तोडगा न निघाल्याने निष्फळ ठरली. भाजपने ११४ तर शिवसेनेने ६० जागांचा प्रस्ताव या बैठकीत दिला. परिणामी मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपात युती होणार की नाही याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज सायंकाळी ही बैठक झाली. शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते तर भाजपाकडून शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि बांधकाममंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. या बैठकीत भाजपाने ११४ जागांवर लढण्याची तयारी दर्शवली तर शिवसेनेने केवळ ६० जागा भाजपकरिता सोडण्याची तयारी दाखवल्याने तिथेच चर्चा थांबल्याची माहिती आशिष शेलार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली.

शेलार म्हणाले, 'जे आकडे समोर आले ते पाहता चर्चा न करणे योग्य वाटले. यावरचा निर्णय आता दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील. त्यामुळे पुढची बैठक होणार की नाही याचा निर्णय पक्षनेतृत्व उद्या घेईल.' अनिल देसाई यांनीही सुरुवातीचे आकडेच दोन्ही पक्षांच्या उपस्थित प्रतिनिधींना योग्य न वाटल्याने चर्चा पुढे न गेल्याचे सांगितले.

दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अद्याप युतीत कोणते वितुष्ट आले नसल्याचे मान्य केले. दोन्ही पक्षाकडे पुरेशा ताकदीचे नेते आहेत जे याबाबत पुढील दिशा ठरवतील, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज