अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच शिंदे-फडणवीसांचा संघर्ष उघड केला अन् सगळेच खळखळून हसले!

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात मोर्च्याची घोषणा केली आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 10:15 pm
मुंबई : भाजपच्या विविध नेत्यांकडून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही मोठे नेते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray ajit pawar jayant patil
उद्धव ठाकरे - अजित पवार - जयंत पाटील


एकनाथ शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असून सरकार तर देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून सतत केला जातो. तसंच सत्तास्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावेळी शेजारी बसलेल्या फडणवीस यांनी माईक आपल्याकडे ओढत उत्तर दिलं होतं. तसंच एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना एक चिठ्ठीही दिली होती. याबाबतचे व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. हाच मुद्दा अधोरेखित करत आज उद्धव ठाकरे यांनी आज अजित पवार यांना उद्देशून म्हटलं की, 'दादा...तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल?' उद्धव ठाकरे यांना असा टोला लगावताच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह इतर नेते खळखळून हसू लागले.

राज्यपालांना १७ तारखेपर्यंत हटवलं तरी मोर्चा निघणारच, अजित पवारांचा सरकारला थेट इशारा

दरम्यान, महाविकास आघाडीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधातील आंदोलनाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात १७ डिसेंबरला मुंबईतील राजमाता जिजामाता भोसले उद्यान ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, शक्तीचं विराट दर्शन दाखवण्यासाठी हजर राहा, असं आवाहनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, संजय राऊत, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, विनायक राऊत, भाई जगताप आणि इतर नेतेही उपस्थित होते.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख