अ‍ॅपशहर

राज्यपालांना हटवा अन्यथा पुढच्या ४ दिवसांत...; सरकारला इशारा देत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Shivsena Uddhav Thackeray: कोश्यारींनी याआधीही मराठी माणसांचा अपमान केला होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2022, 5:53 pm
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर पक्षभेद बाजूला ठेवून आपण सर्व महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की, आपण जर शांत बसलो तर आपल्या शूर-वीर म्हणवल्या जाणाऱ्या राज्याच्या अब्रुची लक्तरे या लोकांकडून वेशीवर टांगली जातील. त्यामुळे येते दोन-चार दिवस आपण वाट पाहू आणि राज्यपालांना हटवलं नाही तर या महाराष्ट्रद्रोह्यांना एक खणखणीत इंगा दाखवलाच पाहिजे. मग त्यासाठी महाराष्ट्र बंद करायचा की मोर्चा काढायचा हे आपण ठरवू,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray governor bhagatsingh koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - उद्धव ठाकरे


'महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानतो. मात्र त्यांचा अपमान झाल्यावर भाजपच्या लोकांकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रात ज्यांचं सरकार असतं त्यांच्या विचारांची माणसं राज्यपाल म्हणून नेमली जातात. मात्र या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? ज्या माणसांना वृद्धाश्रमातही जागा मिळत नाही, त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवण्यात आले पाहिजेत. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणंच मी सोडून दिलं आहे. राज्यपालपदाची झूल पांघरली म्हणून त्यांनी काहीही बोलावं, हे सहन केलं जाणार नाही. कोश्यारींनी याआधीही मराठी माणसांचा अपमान केला होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यासह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवा, या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकारकडून नेमका कसा प्रतिसाद दिला जातो आणि खरंच राज्यपालांकडून पदभार काढून घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख