अ‍ॅपशहर

बिहारमध्ये उलथापालथ होताच शिवसेना प्रचंड आशावादी; २०२४ च्या निवडणुकीबाबत मोठा दावा

Uddhav Thackeray : बिहारमधील बदलेल्या समीकरणांच्या आधारे शिवसेनेनं थेट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं गणित मांडलं असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2022, 7:34 am
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीने अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला दूर सारून सत्ता खेचून आणणाऱ्या भाजपला बिहारमध्ये नितीश कुमार यांना दणका दिला आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडत राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांच्यासोबत हातमिळवणी केली आणि पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाच्या अग्रलेखातून भाजप नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल करत अहंकाराच्या भिंती कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray narendra modi
उद्धव ठाकरे - नरेंद्र मोदी


'नितीश कुमार यांनी सध्या तरी एक वावटळ निर्माण केली . त्याचे वादळ झाले तर आव्हानाची स्थिती निर्माण होईल. 'ईडी' आणि 'सीबीआय'देखील नितीश कुमारांना रोखू शकली नाही. तेजस्वी यादवही बेधडक आहेत. अहंकाराच्या भिंती जनताच तोडते. बिहारात त्या तुटल्या. महाराष्ट्रातही उद्ध्वस्त होतील. बिहारात नितीश कुमारांनी एक पाऊल टाकले. त्यांच्या मागे असंख्य पावले उमटू द्या. नितीश कुमार आगे बढो! भविष्यात तुम्हाला हजारोंची साथ नक्की मिळेल. राजकारणात कोणीच कायमचा संपत नसतो हे खरेच; पण याला संपवू आणि त्याला संपवू अशा वल्गना करणाऱ्यांचे अस्तित्व नष्ट झाल्याचा इतिहास आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं म्हणत शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलं आहे.

शिवसेना-शिंदे गट पुन्हा समोरासमोर?; सल्लागार समितीतील स्थानावरून नवी ठिणगी

'...तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात'

बिहारमधील बदलेल्या समीकरणांच्या आधारे शिवसेनेनं थेट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं गणित मांडलं आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र राहिले तर लोकसभा निवडणुकीचं चित्र बदलू शकतं, असा आशावाद शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. 'बिहारमध्ये घडणाऱ्या राजकीय क्रांतीचे पडसाद संपूर्ण देशात उमटतात. महाराष्ट्रातले शिवसेना आघाडीचे सरकार पाडले या आनंदात खुशीची गाजरे खात असतानाच बिहारात भाजपविरोधात बंडाची ठिणगी पडली आहे. बाजूला प. बंगाल आहेच. महाराष्ट्रही अशांत टापू बनला आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचे गणित मांडून नितीश कुमार यांनी हे धाडसी पाऊल उचलले असेल तर देशातील समस्त विरोधी पक्षाने नितीश कुमारांचे स्वागत केले पाहिजे. 'ईडी'चा धाक, कपट-कारस्थानाने महाराष्ट्राचे सरकार पाडले, पण बिहारात नितीश कुमार यांनी भाजपला सत्तेतून दूर फेकले, हे सत्य आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आता सरकार बनवत आहेत. ही आघाडी २०२४ मध्ये अशीच भक्कम राहिली तर लोकसभा निवडणुकांचे निकाल बदलू शकतात, हे सत्य आहे,' असा दावा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला

शिवसेना आमदार आणि खासदारांना घेऊन बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नेतृत्वाकडून वारंवार निशाणा साधण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा दाखला देत शिवसेनेकडून पुन्हा एकदा शिंदे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. 'केंद्रीय मंत्रिमंडळात 'जेडीयू'चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकू मुख्यमंत्र्यांनी हा 'बाणा' समजून घेतला पाहिजे,' असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज