अ‍ॅपशहर

तुम्हीही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? आमदार राजन साळवींनी उघड उघड सांगितलं!

कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. खासदार राऊत आणि आमदार साळवी यांच्यात याच मुद्दयावरून सुप्त संघर्ष आहे. त्याचमुळे आमदार राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या शक्यता व्यक्त जात होत्या. त्यावर अधिक स्पष्टपणाने भूमिका मांडत राजन साळवी यांनी शिंदे गटातल्या एन्ट्रीचा थेटपणे इन्कार केला.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2022, 7:05 pm
मुंबई : कोकणातील राजापूरचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास व्यक्तीची भेट घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली होती. पुढच्या काही तासांत ते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करुन उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देतील, असं वृत्त होतं. पण या वृत्तावर खुलासा करुन राजन साळवे यांनी सगळ्या चर्चांवर पडदा पाडला आहे. ठाकरेंसोबत राहणार की शिंदेंकडे जाणार? या प्रश्नाचं उघड उघड आणि 'रोखठोक' उत्तर देत आपल्या विरोधकांचा त्यांनी तिखट समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav Thackeray Rajan Salvi And Eknath Shinde
उद्धव ठाकरे, राजन साळवी आणि एकनाथ शिंदे


"मी देवेंद्र फडणवीसांना भेटून शिंदे गटात सामील होण्यास इच्छुक आहे, अशा बातम्या काल विविध प्रसारमाध्यमांनी चालवल्या. गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. शिवसेनेत विविध पदं भूषवलं. बाळासाहेब ठाकरेंचा सर्वाधिक सहवास मला लाभला. आधी शिवसैनिक, मग नगरसेवक, नंतर नगराध्यक्ष, ठाकरे परिवाराच्या आशीर्वादामुळे जिल्हाप्रमुख आणि मग शिवसेनेचा तीन वेळा आमदार झालो. आता शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय.... मला आणखी काय हवंय... मरेयपर्यंत ठाकरेंसोबतच राहिन... कोणत्या आमिषामुळे मी कोणत्या गटा-तटात जाणार नाही", अशी रोखठोक भूमिका मांडून शिंदे गटातल्या एन्ट्रीचा राजन साळवी यांचा थेटपणे इन्कार केला.

कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आमदार राजन साळवी हे अनुकूल आहेत तर खासदार विनायक राऊत हे कायम प्रकल्पविरोधी मत मांडत आले आहेत. खासदार राऊत आणि आमदार साळवी यांच्यात याच मुद्दयावरून सुप्त संघर्ष आहे. त्याचमुळे आमदार राजन साळवी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या शक्यता व्यक्त जात होत्या. त्यावर अधिक स्पष्टपणाने भूमिका मांडताना राजन साळवी म्हणाले, "माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहे. माझी निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी आहेत. त्यामुळे मी पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत आहे. आदित्य ठाकरेंसोबत महाराष्ट्रात फिरतोय, मी कोणत्याच गटा-तटात जाणार नाही. मरेपर्यंत ठाकरेंची साथ सोडणार नाही"

"सर्वसामान्य शिवसैनिकाला एवढं सारं दिल्यानंतर त्याचा आणखी काय हवंय..... उद्धव ठाकरेंनी मला उपनेता केलं. उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर संघटनेसाठी काम करणं, संघटना बळकट करणं, पक्षाच्या बांधणीसाठी फिरणं, ही माझी जबाबदारी आहे. हीच जबाबदारी ओळखून एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मी आदित्य ठाकरेंबरोबर कोकण दौऱ्यात फिरतो. पश्चिम महाराष्ट्रातही त्यांच्यासोबत होतो. भविष्यातही मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे" असं राजन साळवींनी स्पष्ट केलं.

कोकणात सर्वात मोठा धक्का, आणखी एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत
कोण आहेत राजन साळवी?

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या विद्यमान आमदारांपैकी राजन साळवी हे सगळ्यात ज्येष्ठ आमदार आहेत. साळवी यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. राजापूर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांचा पराभव करून ते निवडून आले होते. राजन साळवी यांनी रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक, नगराध्यक्ष तसंच शिवसेना जिल्हाप्रमुखपदावरही काम केलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असले तरी राजन साळवी यांनी मंत्रिमंडळात काम करण्यासाठी एकदाही संधी मिळालेली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत आली. मात्र निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या उदय सामंत यांच्यामुळे साळवी यांचे मंत्रिपद हुकले होते.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख