अ‍ॅपशहर

भाजपच्या १०० लोकांची यादी पाठवून देतो; राऊतांचं ईडीला आव्हान

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर व कार्यालयांवर ईडीने टाकलेल्या छाप्यांनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीला आव्हानच दिलं आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut challenges ED)

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 12:59 pm
मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईमुळं शिवसेना संतापली आहे. 'ईडी ही एका पक्षाची राजकीय शाखा असल्याप्रमाणं काम करते आहे. ज्यांचे आदेश ईडी पाळत आहे, त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी त्यांच्याकडं पाठवून देतो. करा कारवाई,' असं थेट आव्हान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut challenges ED)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sanjay Raut


प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. 'आमच्या प्रत्येक आमदाराच्या, खासदाराच्या आणि नेत्याच्या घरांसमोर ईडीनं कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही. तुम्ही कितीही नोटिसा पाठवा. कितीही धाडी घाला. खोटी कागदपत्रं तयार करा. पण या महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत सत्याचाच विजय होईल,' असं राऊत म्हणाले.

वाचा: शिवसेनेचे मुखिया सुद्धा असेच उद्योग करतात; सोमय्यांचा ठाकरेंवर आरोप

'प्रताप सरनाईक यांनी गेल्या काही काळात अर्णव गोस्वामी, कंगना राणावत व अन्वय नाईक ही प्रकरणं सरनाईक यांनी लावून धरली. त्या आकसातूनच त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. पण आम्ही पर्वा करत नाही. आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. नोटिसा कसल्या पाठवता? घरी या. अटक करायची तर अटक करा. प्रताप सरनाईक घरी नाहीत हे पाहून धाड टाकलीय. ही नामर्दानगी आहे. भाजपनं सरळ लढावी. शिखंडीसारखं ईडी, सीबीआयचा वापर करून लढत असलात तरी विजय आमचाच होईल,' असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.
वाचा: ...म्हणून ईडीने सरनाईकांच्या घरावर धाड टाकली असेल: फडणवीस

'गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखा वागतो. ईडी ही राजकीय पक्षाची शाखा असल्याप्रमाणं काम करतेय. ज्यांचे आदेश ते पाळताहेत त्या पक्षाच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे उद्योग आणि धंदे काय आहेत? त्यांना कुठून पैसा येतो? मनी लॉण्ड्रिंग कसं चालतं? निवडणुकीसाठी कसा पैसा येतो? कुठं ठेवला जातो? कसा वाटला जातो? कोणाच्या माध्यमातून वापरला जातो? नामी काय आणि बेनामी काय याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे,' असंही ते म्हणाले.

वाचा: ...म्हणून इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

'तपास करण्याची कोणावरही बंदी नाही. पण सरकारशी संबंधित लोकांना, त्यांच्या कुटुंबांना मानसिक त्रास द्यायचा असं ठरवून सुरू असलेले हे उद्योग तुमच्यावर उलटतील. साम, दाम, दंड, भेदामध्ये आम्ही डॉक्टरेट घेतलीय. ते कुणी आम्हाला शिकवू नये,' असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज