अ‍ॅपशहर

संजय राऊत यांच्या अटकेनंतर 'सामना'चा पहिला अग्रलेख; राज्यपालांसह भाजपवर घणाघाती हल्ला

Sanjay Raut Arrest : मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यात भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपवर टीका केली आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2022, 7:26 am
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना रात्री उशिरा सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभा खासदार असलेले संजय राऊत हे 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादकही आहे. या दैनिकातून ते शिवसेनेची बाजू ठामपणे मांडत असतात. राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर सामनातून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचंच लक्ष होतं. सामना अग्रलेखातून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा जोरदार समाचार घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut koshyari
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी - संजय राऊत


संजय राऊत यांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेमुळेच त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून तडकाफडकी कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. 'महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्रात त्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर 'ईडी'ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी लोकांच्या मनातील भडका विझणार नाही,' असं 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संजय राऊत यांना अटक; शिवसेनेची भूमिका नेटाने मांडणार कोण?

भाजपवर घणाघाती हल्ला

संजय राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर टीका करताना शिवसेनेनं देशाचा स्वातंत्र्य लढा आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यामधील भाजपशी संबंधित लोकांच्या योगदानावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. 'संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी 'ईडी'ची पथके पोहोचली. लोक काय ते समजून गेले. भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप विचारांच्या लोकांचा सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही. मुंबईतील धनिक मंडळ हेच त्यांचे सर्वस्व आहे. बेळगावसह मराठी सीमा भागाविषयी त्यांना आस्था नाही. महाराष्ट्राचे दोन-तीन तुकडे पडले तरी भाजपचे मन अस्वस्थ होणार नाही. हा त्यांचा स्वभावधर्म, गुणधर्म आहे,' असा हल्लाबोल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Sanjay Raut Arrested by ED : संजय राऊत यांना अखेर अटक, ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

'राज्यपालांकडून मतपेढी करण्याचं काम'

'घटनात्मक पदावर बसून मुंबई -महाराष्ट्राच्या नागरिकांत जात-प्रांताची भेदाभेदी करणारी विधाने राज्यपाल कोश्यारी करीत आहेत. मुंबई-ठाणे काय किंवा महाराष्ट्र काय, मराठी माणसांबरोबर इतर भाषिक व प्रांतिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. कोठेही मिठाचा खडा पडलेला नाही. कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्याने सगळ्यांचाच सांभाळ केला. राज्यपाल मात्र जात-प्रांतात भेदाभेदी करून महाराष्ट्रात व हिंदुत्वात फूट पाडत आहेत. त्यामुळे कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की आणखी काही, असा प्रश्न मराठी माणसाला पडला असेल तर तो चुकीचा कसा म्हणता येईल! गुजराती, राजस्थानी, हिंदी भाषिक लोक यांना वेगळे पाडून भाजपसाठी वेगळी 'मतपेढी' करण्याचे काम घटनात्मक पदावरील व्यक्ती करत असेल तर राष्ट्रीय एकात्मतेची ऐशी की तैशी व्हायला वेळ लागणार नाही,' अशा शब्दांत शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज