अ‍ॅपशहर

'थैलीशाहीचं राजकारण यशस्वी होत नाही'

नांदेड महापालिका निवडणूक निकालावरून मित्रपक्ष शिवसेनेनं भाजपला जोरदार चपराक लगावली आहे. भाजपचाही पराभव होऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीनं देशभर गेला आहे. फोडाफोडी आणि थैलीशाहीचं राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नसतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

Maharashtra Times 13 Oct 2017, 9:50 am
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena uddhav thackeray attack on bjp maharashtra over nanded municipal election result
'थैलीशाहीचं राजकारण यशस्वी होत नाही'


नांदेड महापालिका निवडणूक निकालावरून मित्रपक्ष शिवसेनेनं भाजपला जोरदार चपराक लगावली आहे. भाजपचाही पराभव होऊ शकतो, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीनं देशभर गेला आहे. फोडाफोडी आणि थैलीशाहीचं राजकारण सदासर्वकाळ यशस्वी होत नसतं, हा या निवडणुकीचा सर्वात मोठा धडा आहे, अशी शिकवणीही शिवसेनेनं घेतली.

भाजपनं विधानसभा निवडणुकांप्रमाणं महापालिका निवडणुकांतही आयारामांचं दुकान उघडलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे तब्बल पंधरा नगरसेवक भाजपनं गळाला लावले. त्यांच्या हाती 'कमळ' देऊन भाजपनं उमेदवारीही दिली. आपापल्या पक्षांशी बेईमानी करून गेलेल्या बहुतांश नव्या ‘कमलदल’धाऱ्यांना नांदेडकरांनी चिखलात घुसळून पार उलथंपालथं केलं, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

>> अशोक चव्हाण यांची व्यूहरचना यशस्वी ठरली आणि नांदेडात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले, हे आता मान्य करावेच लागेल.

>> शिवसेनेला या निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नाही. हे अपयश म्हणा किंवा पराभव, त्याचा जो काय अभ्यास करायचा तो शिवसेना आपल्या पद्धतीने करेलच!

>> काँग्रेस आणि साम, दाम, दंड, भेद या सर्व नीती-अनीतींचा अवलंब करणाऱ्या भाजपशी सामान्य शिवसैनिकांनी दोन हात केले, संघर्ष केला, हे आम्ही अभिमानानं सांगू शकतो.

>> निवडणुका जिंकण्यासाठी हाडकं फेकून मासे गळाला लावणे किंवा जाती-पातींच्या मोटा बांधून मतांची बेगमी करणं अशी थेरं शिवसेनेला कधीच जमली नाहीत, किंबहुना जमणारही नाहीत.

>> संपूर्ण देश काँग्रेसमुक्त करण्याचं उद्दिष्ट डोळय़ांसमोर ठेवणाऱ्या आमच्या मित्रपक्षासाठी नांदेडचा निकाल अधिक धक्कादायक आहे.

>> महापौरपदी कोणाला बसवायचं, स्थायी समितीवर कोणा-कोणाला पाठवायचं इथपर्यंत तयारी झाली होती. निकालानंतर जल्लोष करण्यासाठी फटाक्यांची गोदामंही भरून ठेवली होती. मात्र या सगळय़ाच स्वप्नांचा चक्काचूर झाला.

>> एका ‘बेडूकछाप’ आमदाराला सगळी जबाबदारी दिल्यानं आहे तो जुना परिवारही नाराज होऊन बसला. मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन प्रचार सभा घेतल्या. ‘अशोकराव, तुमचा किल्ला उद्ध्वस्त होत आहे. नांदेडात लोणचे घालायलाही काँगेस उरणार नाही,’ असा फाजील आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज