अ‍ॅपशहर

धनुष्यबाण कुणाचा? एकनाथ शिंदेंचा की तुमचा? राऊतांचा प्रश्न, उद्धव यांचं ठाकरी 'स्टाईल'ने सडेतोड उत्तर

Uddhav Thackeray News : शिवसेनेवरच दावा सांगण्याचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाचा प्रयत्न आहे. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रयत्नावर उद्धव यांनी संताप व्यक्त केला आहे.

Authored byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2022, 7:54 am
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार आणि खासदारांसह केलेल्या बंडानंतर आता शिवसेना नक्की कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेचं नेतृत्व मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू असून लोकप्रतिनिधींनंतर आता शिवसेनेचे जास्तीत जास्त पदाधिकारीही आपल्याकडे यावेत, यासाठी शिंदे यांच्याकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेशीर पेच निर्माण झालेला असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांवर खरमरीत शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray eknath shinde shivsena bhavan
उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे


'माझा अजूनही देशाच्या घटनेवर भरवसा आहे, कायद्यावर भरवसा आहे. चोरी-मारी सगळीकडेच चालते असं माझं अजिबात मत नाही. मी जे म्हटलं ना की 'सत्यमेव जयते'… नाहीतर हे वाक्य तुम्हाला पुसावं लागेल आणि मग एकाची दोन वाक्यं करावी लागतील. एकतर 'असत्यमेव जयते' आणि दुसरं वाक्य 'सत्तामेव जयते.' त्यामुळे सत्तामेव जयतेपुढे तुम्ही असत्य घेऊन जर काही करणार असाल तर ते लोक खपवून घेणार नाहीत,' अशा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

शिवसेनेबाबत विश्वासघाताचं राजकारण वारंवार का? उद्धव ठाकरेंनीच सांगितलं काय चुकतंय

'जनताच यांना पुरून टाकेल राजकारणातून'

ठाकरेंना शिवसेना खरी की खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहेत. त्यामुळे पुरावे देण्याची स्थिती निर्माण करणाऱ्या लोकांना जनताच पुरून टाकेल. लोकं आता निवडणुकांची वाट पाहात आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

ठाण्याच्या पालापाचोळ्याची शिवसेनेला गिळण्याची काय बिशाद, निवडणुका होऊन जाऊ द्यात, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

'माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत असे नाहीयेत, पण...'

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या बंडखोर आमदार-खासदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केलं असलं तरी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेवरच दावा सांगण्याचा या गटाचा प्रयत्न आहे. शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रयत्नावर संताप व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, 'माझं त्यांना आव्हान आहे, ठाकरे आणि शिवसेना हे नातं तोडून दाखवा. मात्र ते करताना माझ्या वडिलांचे फोटो लावून मतं मागू नका. प्रत्येकाला आई-वडील असतात. मला माझ्या आई-वडिलांबद्दल आदर आहे. तसा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आई-वडिलांबद्दल आदर असला पाहिजे. गेल्याच आठवडय़ात गुरुपौर्णिमा झाली. मी माझ्या वडिलांना आणि आजोबांना गुरू मानतो. प्रत्येकाने मातृदेवभव, पितृदेवभव असं देव मानले पाहिजेत. स्वतःच्या आई-वडिलांचे फोटो लावावेत आणि मतं मागावीत. आज माझ्या दुर्दैवाने माझे आई-वडील माझ्यासोबत असे नाहीयेत, पण ते माझ्यात आहेत असे मी मानतो. पण ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. मी तर म्हणेन असा आशीर्वाद दुसरा मिळू शकत नाही. त्यांना घेऊन सभा घ्याव्यात, भाषणं करावीत आणि मतं घ्यावीत. माझे वडील का चोरताय?' असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना विचारला आहे.
लेखकाबद्दल
अक्षय शितोळे
अक्षय शितोळे, २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय.... आणखी वाचा

महत्वाचे लेख