अ‍ॅपशहर

आजारी दुष्काळग्रस्त मुंबईच्या रुग्णालयांत

राज्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे रोगराईचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. औषधांचा तुटवडा, बंद पडलेली आरोग्यकेंद्र, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्येही अनेक ठिकाणी उपचार मिळत नसल्यामुळे उपचारांसाठी रुग्णांनी मुंबईतल्या सार्वजनिक रुग्णालयांची वाट धरली आहे.

30 22 Dec 2018, 12:34 am
Sharmila.kalgutkar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sick drought hit people in mumbai hospitals
आजारी दुष्काळग्रस्त मुंबईच्या रुग्णालयांत

Twitter - @ksharmilaMT

मुंबई

राज्यातील दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत असल्यामुळे रोगराईचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. औषधांचा तुटवडा, बंद पडलेली आरोग्यकेंद्र, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्येही अनेक ठिकाणी उपचार मिळत नसल्यामुळे उपचारांसाठी रुग्णांनी मुंबईतल्या सार्वजनिक रुग्णालयांची वाट धरली आहे. दुष्काळामुळे प्रकृतीची आबाळ होत असल्याच्या तक्रारी विदर्भ, मराठवाडा येथून जेजे रुगणालयामध्ये आलेल्या या रुग्णांनी केल्या.

बीड, माजलगाव येथील सहा महिलांचा गट रुग्णालयामध्ये उपचारासाठी आला होता. गावामध्ये आरोग्यकेंद्रे आहेत पण तिथे औषधे नाही. कोणत्याही आजारासाठी एकच गोळी दिली जाते. पाठीची, हाडांची, मणक्याच्या विविध प्रकारच्या दुखण्यांनी या महिला त्रस्त होत्या. यातल्या केवळ अनिताताई पाटील काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या नातेवाईकांच्या घरी येऊन जेजे रुग्णालयातून उपचार घेऊन गेल्या होत्या. गावातल्या इतर आजारी महिलांनी त्यांना गळ घातली, मिळेल ती गाडी पकडून त्या आजारी महिलांना रुग्णालयात घेऊन आल्या.

विदर्भ, मराठवाडा येथील दुष्काळग्रस्तांनी महात्मा फुले आरोग्ययोजनेचे कार्ड आवर्जून आणले होते. पण त्या कार्डाचा गावातील आरोग्यकेंद्रामध्ये कोणताही उपयोग न झाल्याचे त्या सांगतात. आता रेशनकार्डची अट असली तरी पूर्वीही हे कार्ड कधीही वापरले नव्हते. तालुक्याच्या ठिकाणी जी मोठी रुग्णालये आहेत तिथेही पाण्यावाचून परिस्थिती बिकट आहे. आरोग्यकेंद्रे आहेत तर तिथे डॉक्टर नाहीत, अशी वेळ ओढवल्याचे त्या सांगतात. दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी स्वतःचे शेत असूनही दुसऱ्याच्या शेतात मुलाबाळांसह या महिला स्वतः मजूर म्हणून काम करतात. दिवसाला शंभर रुपये मिळाले तर त्यात चूल कशी पेटवायची अन् डॉक्टराला पैसा कसा घालायचा, हा प्रश्न त्यांना भेडसावतो. त्यामुळे मोफत आणि चांगल्या उपचारासाठी मुंबईतल्या रुग्णालयांची वाट धरल्याचे सांगतात.

गर्भवती लेकी-सुनांची काळजी.

माजलगावहून आलेल्या सविता खंदारे यांच्या मुलीची प्रसूती जवळ आली आहे, गाव ओस पडायला लागले आहे. मुख्य आरोग्यकेंद्रामध्ये जायचे तर रुग्णवाहिका वेळेवर येईल की नाही याची चिंता त्यांना भेडसावते. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ताप, खोकला तसेच त्वचाविकारांचा पीळ वाढता आहे. मुंबईमध्ये कुणी ओळखीचे नातलग असले तरीही ते किती दिवस ठेवून घेणार, औषधोपचार होईपर्यंत रुग्णालयामध्येच राहण्याचा पर्याय या कुटुंबांनी स्वीकारला आहे.

वैद्यकीय उपचारातील तत्परतेमुळे ओढा

असाध्य व्याधींमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण ग्रामीण भागातून येण्याचा कल होता. आता दुष्काळग्रस्त भागातील आरोग्याचे प्रश्न अधिक बिकट झाले आहे. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये महात्मा फुले आरोग्ययोजनेसह मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेच्या माध्यमातून तत्परतेने मदत मिळू शकते. त्यामुळे वैद्यकीय सुविधा नसणारे दुष्काळग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात शहरातील सार्वजनिक रुग्णालयांकडे येण्याचे प्रमाण वाढल्याचे जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे सांगतात.

शस्त्रक्रिया झाल्या ठप्प..

शेतात पिकत नाही, गेल्या वर्षी जे पिकवले होते ते संपत आले आहे, अशा परिस्थितीमध्ये मजूर म्हणून इतरांच्या शेतात राबणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अस्थिभंगाच्या तक्रारी, पाय, पाठ मोडणे ,कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडांच्या दुखण्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. चालताही येत नसलेल्या अनेकांना शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय सांगितला आहे. मात्र शस्त्रक्रिया विभाग पाण्याअभावी बंद झाल्याने शहराकडे येण्यावाचून पर्याय नसल्याचे मराठवाड्यातल्या मारुती सूर्यवंशी यांनी सांगितले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज