परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आता नव्याने होणाऱ्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरही वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान असून समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. परिवहन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा पंधरवड्याचा सांगता समारंभ मुंबईत झाला, त्यावेळी रावते बोलत होते.
समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ तासांत होणार आहे. त्यामुळे या महामार्गावर वेगमर्यादा ठेवणे हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. सध्या महामार्गावर होणारे अपघात पाहता वेग मर्यादेवरील यंत्रणा आपल्याकडे आहे का, हाच मुद्दा आहे. त्यामुळेच समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार असल्याचे रावते यांनी सांगितले. अपघातामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात, विशेषत: ग्रामीण भागात दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून दुचाकी अपघातांची आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. हेल्मेट, सीटबेल्टचा वापर यासारख्या छोट्या उपाययोजनांचा अवलंब केला, तरी अपघातातील मोठी जीवितहानी टाळता येऊ शकेल. त्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने, सजगपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही रावते यांनी केले.
देशभरात रस्ते अपघातात दरवर्षी सव्वा ते दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. देशाच्या मनुष्यबळाची ही फार मोठी हानी आहे. आपल्या देशात जगातील फक्त २ टक्के वाहने आहेत. पण जगातील १० टक्के रस्ते अपघात आपल्या देशात होतात. हे रोखणे आवश्यक असून यासाठी वाहनचालकांनी रस्ते नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक यांनी सांगितले. यावेळी विनाअपघात वाहन चालविणारे चालक, तसेच रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व सरकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.