- ४० टक्क्यांपेक्षा कमी भारमानाच्या फेऱ्या होणार रद्द
- 'रातराणी'चा चालकाच आता वाहक
- खासगी वाहतूकदारांचा फायदा
-अपघात वाढण्याची शक्यता
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
लॉकडाउन संपल्यानंतर लाखो नागरिकांचा एसटी प्रवास अधिक खडतर होण्याचे संकेत आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी भारमान असलेल्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तसेच वाहकाची बचत करण्यासाठी आता रातराणीच्या चालकालाच वाहकाचे काम करावे लागणार आहे. फेऱ्या रद्द केल्यास क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतूकीला चालना मिळेल. यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत ही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या एसटीचे सरासरी भारमान ५५ टक्क्यांच्या आसपास आहे. ४० टक्क्यांपेक्षी कमी भारमानाच्या फेऱ्या सरसकट बंद केल्यास शेकडो फेऱ्या बंद कराव्या लागतील. राज्यातील ३१,७०० खेड्यांमधील ९२ टक्के नागरिक थेट प्रवासासाठी एसटीवर अवलंबून आहे, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.
फेऱ्या बंद केल्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवरही होईल. सध्या लॉकडाउन काळात अनेकांना नोकरी टिकेल की नाही याबाबत शाश्वती नाही. अशातच फेऱ्या बंद करण्याच्या निर्णयामुळे एसटी कामगारांमध्ये ही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे फेऱ्या बंद करण्यापेक्षा स्वच्छतेचे कंत्राट (ब्रिक्स), भाडेतत्त्वांवरील शिवशाही, गणवेशाच्या कापड व शिलाई भत्याऐवजी ड्रेसकोड हे उपक्रम बंद करावेत, अशी मागणी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी केली आहे.
सुरक्षा धोक्यात
मोटार वाहन कायद्यामध्ये चालक सोबत वाहक/ क्लिनर असणे बंधनकारक आहे. अनेक लांब पल्ल्यांच्या मार्गावर रातराणी एसटी सुरू आहेत. अपघात किंवा एसटीमध्ये बिघाड झाल्यास चालक काहीच करू शकणार नाही. यामुळे प्रवासी सुरक्षा धोक्यात येऊ शकेल, असे सांगत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
तोटा भरून काढण्याचे उपाय
एसटी महामंडळाचा वाढता तोटा कमी करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत लॉकडाउन काळात एसटी ठप्प झाल्याने महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. हा तोटा भरून काढण्यासाठी कमी प्रवासी असलेल्या फेऱ्या रद्द करणे आणि वाहकांची बचत करणे हे निर्णय घेण्यात आले. तसेच यापूर्वीचे प्रतिकूल निर्णय तातडीने रद्द करावे, अवैध प्रवाशी वाहतूक रोखण्यासाठी प्रशासन व शासकीय पातळीवर प्रयत्न करावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
…………………