अ‍ॅपशहर

करोना: मोदी सरकारच्या मदतीविना महाराष्ट्राची चोख कामगिरी; 'हा' घ्या पुरावा

करोना काळामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतला असला तरीही राज्याने मात्र संसर्ग रोखणाऱ्या गोळ्या, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, व्हेण्टिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावून चोख कामगिरी बजावली आहे.

Authored byशर्मिला कलगुटकर | महाराष्ट्र टाइम्स 6 Oct 2020, 1:55 pm
मुंबई : करोना काळामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतला असला तरीही राज्याने मात्र संसर्ग रोखणाऱ्या गोळ्या, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, व्हेण्टिलेटर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावून चोख कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी निधी वितरित करताना केंद्र सरकारची या दोन राज्यांवर विशेष कृपादृष्टी आहे!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम केंद्रीय मदतीविना चोख कामगिरी


उपलब्ध माहितीनुसार कोविडसाठी भारतात १५ हजार ४२९ प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. त्यापैकी ३३६० म्हणजे २१.४९ टक्के सुविधा महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांशी तुलना करता हे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. विलगीकरण खाटांमध्येही राज्याने चांगली कामगिरी केली आहे. भारतामध्ये एकूण विलगीकरणासाठीच्या खाटा १५ लाख ५६ हजार १०१ असून, त्यापैकी ३ लाख ४९ हजार ८२० म्हणजे २२.४८ टक्के खाटा महाराष्ट्रात आहेत. ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ओटू खाटांमध्येही राज्याचा क्रमांक पहिला आहे. देशातील अशा खाटांची एकूण संख्या २ लाख ३३ हजार २५ आहे. तर महाराष्ट्रातील संख्या आहे प्रमाण ५६ हजार ६०२ म्हणजे २४.२९ टक्के. तमिळनाडूमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेत निम्म्या म्हणजे २५ हजार ४०७ ओटू खाटा आहेत. आयसीयू खाटांची संख्या देशात ६३ हजार ५२६ आहे. त्यापैकी राज्यात या आयसीयू खाटांची उपलब्धता १४ हजार ८३४ इतकी आहे. वाढत्या रुग्णसंख्येसाठी ती अपुरी असली तरीही हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. व्हेण्टिलेटरसाठीही केंद्रांकडून पुरेशी मदत मिळाली नसताना राज्याच्या सरकारी, खासगी आरोग्य यंत्रणेने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ६ हजार ९२४ व्हेण्टिलेटर उपलब्ध केले होते. देशात ही संख्या ३२ हजार ४५० इतकी आहे. म्हणजे येथेही देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रमाण २१.३३ टक्के आहे. (उत्तरार्ध)

उत्तर प्रदेश, तमिळनाडूकडे विशेष लक्ष

तमिळनाडूमध्ये रुग्णसंख्या ही सुमारे पाच लाख असून, महाराष्ट्राच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. तरीही सर्वाधिक निधी तमिळनाडूला देण्यात आला. उत्तर प्रदेशमध्येही महाराष्ट्राशी तुलना करता रुग्णसंख्या कमी असली तरीही पीपीई, एचक्यूसी गोळ्या उपलब्ध करून देताना राज्यापेक्षा तेथे तीन ते सात टक्के अधिक वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या.

मास्क, पीपीई किट, व्हेण्टिलेटरही अपुरे

निधी वाटपाप्रमाणे औषधे, एन-९५ मास्क, पीपीई किट, व्हेण्टिलेटर तसेच इतर यंत्रसामुग्रीच्या वितरणामध्येही दुजाभाव करण्यात आला आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी २१.८७ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहे. भारतात करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ३७.०५ टक्के असून, प्रत्येकी तीन व्यक्तींमधील एकाचा मृत्यू हा राज्यात झालेला आहे. सीएफएक्सआयव्हीडी आरटीपीसीआर यंत्रासाठी भारतात ७.३ कोटी रुपयांचे वाटप झाले. त्यापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ ७६ लाख रुपये आले. अॅटोमेटेड आरएनए यंत्रासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातील ४.२१ कोटी रुपयेच महाराष्ट्राला मिळाले.
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज