म. टा. प्रतिनिधी, मुंबई
रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ शिल्पांच्या माध्यमातून आता पर्यटनाला गती देण्याचा सरकार विचार करत आहे. पाषाणयुगातील कातळ शिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कामास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील १७ गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाणयुगातील कातळ शिल्पे पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र बनणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील भगवती नगर, चवे, देऊद, उक्षी, उक्षी पोचरी, कापडगाव, संगमेश्वर तालुक्यातील निवळी गावडेवाडी, उमरे, कोळंबे तर राजापूर तालुक्यातील कशेळी, देवी हसोळ, वाडी रुंध्ये, सोळगाव, बारसू, देवाचे गोठणे, गोवळ येथे ही कातळशिल्पे आहेत. या शिल्पांचे स्थान, आजुबाजूची वस्ती, तेथील सद्यपरिस्थितीतील सुविधा आणि नैसर्गिक ठेवा या आधारे शिल्पांच्या संवर्धनाचे नियोजन करण्यात येत आहे. या शिल्पाच्या सुरक्षा कुंपणासाठी जांभा दगड, मातीचा वापर करून पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार काम केले जाईल. त्याचप्रमाणे माहिती फलक, शिल्पे जमिनीवर कोरलेली असल्याने उंचावरून पाहण्यासाठी चबुतरा, पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, विश्रांतीस्थळ, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
'कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गयात्री या सामाजिक संस्थेचे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला चांगले सहकार्य लाभले आहे. पुरातत्त्व वस्तूंच्या जतनाचा चांगला अनुभव असलेल्या जाणकारांकडून हे काम काळजीपूर्वक करण्यात यावे', असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालकांना दिले आहेत.
मचाणातून शिल्पदर्शन
कशेळी येथील शिल्प सुमारे ५० फूट लांबीचे असल्याने तिथे काही उंचीवर जाऊन शिल्प बघण्यासाठी चबुतऱ्याबरोबरच अधिक उंचीच्या मचाणाचेही नियोजन आहे. यातील अनेक कातळ शिल्पे ही वैयक्तिक मालकीच्या जागांवर आहेत. संबंधित जमीनमालकांच्या परवानगीने ही कामे करण्यात येणार आहेत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील कातळ शिल्पांच्या माध्यमातून आता पर्यटनाला गती देण्याचा सरकार विचार करत आहे. पाषाणयुगातील कातळ शिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कामास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील १७ गावांमध्ये विखुरलेल्या इतिहासपूर्वकालीन पाषाणयुगातील कातळ शिल्पे पर्यटकांसाठी आकर्षणाचे नवे केंद्र बनणार आहे.
रत्नागिरी तालुक्यातील भगवती नगर, चवे, देऊद, उक्षी, उक्षी पोचरी, कापडगाव, संगमेश्वर तालुक्यातील निवळी गावडेवाडी, उमरे, कोळंबे तर राजापूर तालुक्यातील कशेळी, देवी हसोळ, वाडी रुंध्ये, सोळगाव, बारसू, देवाचे गोठणे, गोवळ येथे ही कातळशिल्पे आहेत. या शिल्पांचे स्थान, आजुबाजूची वस्ती, तेथील सद्यपरिस्थितीतील सुविधा आणि नैसर्गिक ठेवा या आधारे शिल्पांच्या संवर्धनाचे नियोजन करण्यात येत आहे. या शिल्पाच्या सुरक्षा कुंपणासाठी जांभा दगड, मातीचा वापर करून पुरातत्त्व खात्याच्या नियमानुसार काम केले जाईल. त्याचप्रमाणे माहिती फलक, शिल्पे जमिनीवर कोरलेली असल्याने उंचावरून पाहण्यासाठी चबुतरा, पर्यटकांसाठी प्रसाधनगृह, विश्रांतीस्थळ, उपहारगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
'कातळ शिल्पांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामी रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गयात्री या सामाजिक संस्थेचे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाला चांगले सहकार्य लाभले आहे. पुरातत्त्व वस्तूंच्या जतनाचा चांगला अनुभव असलेल्या जाणकारांकडून हे काम काळजीपूर्वक करण्यात यावे', असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालकांना दिले आहेत.
मचाणातून शिल्पदर्शन
कशेळी येथील शिल्प सुमारे ५० फूट लांबीचे असल्याने तिथे काही उंचीवर जाऊन शिल्प बघण्यासाठी चबुतऱ्याबरोबरच अधिक उंचीच्या मचाणाचेही नियोजन आहे. यातील अनेक कातळ शिल्पे ही वैयक्तिक मालकीच्या जागांवर आहेत. संबंधित जमीनमालकांच्या परवानगीने ही कामे करण्यात येणार आहेत, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.