म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेच्या स्मृतीदिनानिमित्त शनिवारी अनेक मुंबईकरांनी या स्थळी मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळी रेल्वेने आता तरी प्रवाशांच्या जिवाशी चालवलेला खेळ थांबवावा, अशी काकुळतीने विनंती केली जात होती.
एल्फिन्स्टन पुलावर शिवसेना, खापरीदेव क्रीडा मंडळाप्रमाणेच वाल्हेकर परिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यासाठी होर्डिंग लावण्यात आले होते. यावेळी प्रवाशांनी आपले अनुभव कथन केले. 'शुक्रवार रात्रीपासूनच आमच्या मनात कालवाकालव सुरू होती. हा प्रसंग घडून एक वर्ष झाले, पण ते दुर्दैवी क्षण अजूनही विसरता येत नाही', अशी प्रतिक्रिया मुंबई सेंट्रलहून आलेल्या विहंग काळे यांनी व्यक्त केली. दादरचे रहिवासी कुणाल जोशी यांनी रेल्वे आणि अन्य यंत्रणांनी प्रवाशांच्या जिवाशी खेळ करू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्याप्रमाणेच या पुलावरून जातानाच होर्डिंगकडे लक्ष जाताच अनेक प्रवाशांची पावले तिथे वळत होती. काही क्षण भावूक, शोकाकुल झालेल्या मुंबईकरांनी जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
दुर्घटनेत बचावलेल्या शिल्पा विश्वकर्मा याही प्रभादेवी स्थानकाजवळ आल्या होत्या. ही दुर्घटना विसरता येत नसून भविष्यात त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, असे मत त्यांनी मांडले. शुक्रवारी एन. एम. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शांतता आणि एकात्मता हा विषय घेऊन स्थानकावर चित्रे रंगवून वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. एका वर्षानंतरही इतर पुलांबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचा आरोपही शेवाळे यांनी यावेळी केला.