म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यानंतर बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांची सुरक्षा धोक्यात आल्याची गंभीर दखल बोर्डाने घेतली आहे. उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी मुंबईतील तपासणी केंद्रांवर भरारी पथकांद्वारे भेटी देण्यात येणार आहेत. याबाबतच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
दहिसरमधील इस्रा शाळेतून दहावीच्या तब्बल ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्याच्या घटनेनंतर बोर्डाला बरीच टीका सहन करावी लागली होती. चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांपैकी फक्त ३१६ उत्तरपत्रिका पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच युवा सेनेने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यात एक प्राध्यापक हॉटेलात उत्तरपत्रिका तपासत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच काही प्राध्यापक बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेत असल्याची तक्रारही पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर, बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बोर्डाकडून विभागवार भरारी पथके नेमण्यात आली असून उत्तरपत्रिकांची तपासणी व्यवस्थित होत आहे की नाही? उत्तरपत्रिका बाहेर नेण्यात आल्या आहेत का? यांसारख्या गोष्टींवर हे भरारी पथक विशेष लक्ष ठेवणार आहे, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. शाळांकडून इतर कोणत्या गोष्टींबाबात हलगर्जी होत आहे का, यावरही भरारी पथक लक्ष देणार असून सध्या हे भरारी पथक पश्चिम उपनगरातील शाळांना भेटी देणार असल्याचे कळते. दहिसरमधील शाळेने सुरक्षेबाबत योग्य खबरदारी न घेतल्यानेच उत्तरपत्रिका चोरीचा प्रकार घडला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरपत्रिका ठेवलेल्या केंद्रांवरील सुरक्षा उपाययोजनांबाबत अधिकारी पथकाकडून पाहणी करण्यात येणार आहे, असे बोर्डाचे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले.