म. टा. प्रतिनिधी, मुंबई
एसटी प्रवासामुळे प्रवाशांना अनेक समस्यांनी ग्रासले असूनही त्याबाबत नेमकी कोठे तक्रार करावी हे माहीत नसल्याने एसटीची तक्रार पुस्तिका कोरीच राहिली आहे. यामुळे डिसेंबरमधील सुट्टीच्या कालावधीत मुंबईबाहेर निघणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जैसे थे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
एसटी स्वच्छ नाही, एसटी वेळेत सुटत नाही, वाहक उद्धट वागतो, चालक मोबाइलवर बोलत गाडी चालवतो अशा प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. प्रवाशांना तक्रारी व सूचना करणे सहजशक्य व्हावे, यासाठी 'तक्रार पुस्तिका' ही योजना राबवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. सद्यस्थितीत महामंडळात सुमारे ३४ हजार वाहक काम करतात. प्रत्येक वेळी आपल्या ड्युटीवर जाताना त्या वाहकाकडे एक तक्रार पुस्तिका दिली जाते. प्रवासात प्रवाशांना एसटीबद्दल किंवा एसटीच्या कर्मचाऱ्यांविषयी काही तक्रार व सूचना करावयाच्या असल्यास वाहकाकडे पुस्तिका मागून त्यामध्ये रीतसर तक्रार नोंदवणे अपेक्षित असते.
वाहक ड्युटी संपवून आल्यानंतर आगारातील स्थानकप्रमुख संबंधित वाहकाची तक्रार पुस्तिका बघून त्यामध्ये कोणती तक्रार आहे की नाही, याची शहानिशा करतात. तक्रारदार प्रवाशाला त्याने दिलेल्या पत्त्यावर आपली तक्रार प्राप्त झाल्याचा संदेश पाठवला जातो. तसेच ती तक्रार निवारण करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देण्यात येतो. प्रवाशांमध्ये या योजनेबाबत, तसेच तक्रार पुस्तिकेबाबत माहिती नसल्याने प्रवासी तक्रार पुस्तिकेची मागणी करत नाही. यामुळे राज्यातील बहुतांश एसटी स्थानकातील तक्रार पुस्तिका ही कोरीच असल्याचे दिसून आल्याची कबुली अनेक स्थानक प्रमुखांनी दिली.
……
प्रवाशांच्या संख्येत घट
'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे घोषवाक्य असणाऱ्या महामंडळाच्या प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्याबाबत उदासीनतेमुळे वाहकाकडील तक्रार पुस्तिका कोरी राहते. एसटीच्या प्रवासी सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच याची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचतच नाही. परिणामी तक्रारींचे निवारण होत नसल्याने एसटीची प्रवासी संख्या रोडावत आहे.