अ‍ॅपशहर

विज्ञानप्रेमी रस्त्यावर!

विज्ञान संस्थांच्या निधीत कपात, अशास्त्रीय गोष्टींचा प्रचार, ऑनर किलिंग, मागे पडलेली वैज्ञानिक विचारसरणी आदींच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत वैज्ञानिक, प्राध्यापक, विद्यार्थी, विज्ञानप्रेमींनी मार्च फॉर सायन्समध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Maharashtra Times 10 Aug 2017, 4:14 am
विज्ञानमोर्चात सुमारे ५०० जणांचा सहभाग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम students enthusiasts take part in india march for science
विज्ञानप्रेमी रस्त्यावर!


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

विज्ञान संस्थांच्या निधीत कपात, अशास्त्रीय गोष्टींचा प्रचार, ऑनर किलिंग, मागे पडलेली वैज्ञानिक विचारसरणी आदींच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत वैज्ञानिक, प्राध्यापक, विद्यार्थी, विज्ञानप्रेमींनी मार्च फॉर सायन्समध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. ऑगस्ट क्रांती मैदानातून निघालल्या मोर्चाची सांगता भवन्स कॉलेजमध्ये झाली. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा ​विज्ञानासाठी निघालेला हा मोर्चा संख्येने कमी असूनही लक्षवेधी ठरला.

या मोर्चात सुमारे ५०० जणांनी सहभाग घेतला. शांततेत पार पडलेल्या मोर्चामुळे सरकारकडून विज्ञानाविषयी होणाऱ्या दुर्लक्षाचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानात दुपारी ३.३० पासूनच विज्ञानप्रेमी हळूहळू जमू लागले. विज्ञानास महत्त्व मिळण्याच्या तळमळीने ते एकत्र आले होते. त्यानंतर हा सर्व विज्ञानप्रेमींनी ऑगस्ट क्रांती मैदानापासून चौपाटीकडील भवन्स कॉलेजच्या दिशेने कूच केले. घोषणाबाजीचा कुठेही लवलेश नसलेल्या मोर्चात सहभागी झालेल्यांनी फलक, बॅनरमधून आपली भूमिका मांडली. देशभरात विविध ठिकाणी यापद्धतीने विज्ञान मोर्चांचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून बुधवारी हा मोर्चा काढण्यात आला. त्यात सायन्स, नॉट सायलन्स असा मोठा बॅनर लक्षवेधक ठरत होता. सायन्स मॅटर्स, बम विज्ञान नहीं, जनविज्ञान चाहिये, प्रश्न उपस्थित करा, अशा आशयाचे फलक घेत विज्ञानप्रेमी शांततेत मार्गक्रमण करत होते. विज्ञानाविषयी असणारी अनास्था, विज्ञान संस्थांच्या निधीत कपात, शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभाव आदी कारणांमुळे देशातील विज्ञानाची पिछेहाट होत आहे. त्याविषयी जनजागरुकता निर्माण करण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे निमंत्रक डॉ. अनिकेत सुळे यांनी स्पष्ट केले.

पावसाच्या धारांमध्येही आपले उद्दिष्ट सफल करण्यासाठी विज्ञानप्रेमी मार्गक्रमण करत राहिले. या मोर्चात मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत, प्रा. हेमचंद्र प्रधान, प्रा. श्रीकृष्ण दाणी, प्रा. मयांक वाहिया, प्रा. अर्णब भट्टाचार्य, प्रा. एम. कृष्णन, मुग्धा कर्णिक, साठ्ये कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर पानसे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यासह मुंबई विद्यापीठासह आयआयटी, साठ्ये कॉलेज, झेवियर्स कॉलेज, झुनझुनवाला कॉलेज आदी कॉलेजमधील आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. विज्ञान संस्थांच्या निधीत कपात होत असल्याने संशोधनासह पायाभूत सुविधांना त्याची झळ बसत असल्याचा मुद्दा प्रा. सावंत यांनी उपस्थित केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज