म. टा. प्रतिनिधी, मुंबई
एफवाय प्रवेशाची पहिली यादी गुरुवारी जाहीर झाली असून या यादीच्या वाढलेल्या कट ऑफने सगळ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदा अनेक नामांकित कॉलेजांचा बारावीचा निकाल ९५ टक्क्यांहून अधिक लागल्याने इनहाऊस कोट्यातील वाढलेली विद्यार्थी संख्या आणि तेरावी प्रवेशासाठी उपलब्ध मर्यादित जागा यामुळे त्याचा थेट परिणाम एफवाय प्रवेशावर होणार आहे. विशेष म्हणजे, अनेकांचा नामांकित कॉलेजांचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून ५० ते ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत्या काळात चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार एफवाय प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार जवळपास सर्वच नामांकित कॉमर्स कॉलेजांचा कट ऑफ ९० ते ९५ टक्क्यांच्या घरात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हा कट ऑफ वाढला असल्याने आवडत्या कॉलेजांत प्रवेशासाठी रांगेत असलेल्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच निकालाचा टक्का वाढल्याने यंदा इनहाऊस कोट्यातील जागांवर या विद्यार्थ्यांनी प्रवेश नश्चित केल्याने फार कमी जागा शिल्लक राहिल्या आहेत. दक्षिण मुंबईतील अनेक नामांकित कॉलेजांमधील अवघ्या १० टक्केच जागा आता दुसऱ्या यादीतील प्रवेशासाठी शिल्लक राहिल्याचे कळते. त्यामुळे नामांकित कॉलेजांतील प्रवेशाचा मार्ग लवकरच बंद होणार असून प्रवेशासाठी रांगेत उभे असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटी पळापळ करावी लागेल, हे मात्र नक्की.
यंदा राज्य सरकारने कोणत्याही नव्या कॉलेजांना मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ संलग्नित कॉलेजांमध्ये प्रवेशासाठीच्या जागा मर्यादित राहिल्या आहेत. त्यातच यंदा बारावीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने प्रवेशाचे गणित चुकणार असल्याने कॉमर्स कॉलेजांची दमछाक होणार आहे. कॉमर्स कॉलेजांबरोबर आर्टस शाखेच्या कॉलेजांतील प्रवेशासाठी हीच परिस्थिती दिसून येत आहे. दुसरीकडे आर्टस् शाखेमध्येजागा उपलब्ध असल्या तरी नामांकित विद्यार्थ्यांना कॉलेजांतील प्रवेशापासून लांबच रहावे लागणार आहे.
प्रवेशांविषयी कोणताही अंदाज लावणे शक्य नसते. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी विविध अभ्यासक्रम किंवा कोर्सेसकडे वळतात. विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया अन्य प्रवेशांच्या तुलनेत लवकर बंद होते त्यामुळे काही वेळा काही जागा रिक्त राहतात. प्रवेशप्रक्रिया बंद झाल्यामुळे त्या जागा भरणे ही शक्य नसते.
- डॉ. किरण माणगांवकर, प्राचार्य ,खालसा कॉलेज
प्रवेशाचा टक्का आणि विद्यार्थ्यांची संख्याही वाढली. परंतु प्रवेशावर त्याचा परिणाम होत नाही. विद्यार्थ्यांनी नामांकित कॉलेजांना प्राधान्य देण्याऐवजी सगळ्याच कॉलेजांना समान महत्त्व दिले तर प्रवेशाचा गोंधळ कमी होईल.
- डॉ. जयश्री फडणीस,
प्राचार्य , विवेकानंद कॉलेज