म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याची एक पोस्ट फेसबुकवर टाकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी शरद पवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या सूर्यकांता पाटील या काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेल्या होत्या. मात्र, तेथेही त्यांच्या वाट्याला फारसे काही न आल्यामुळे त्या सध्या खूप नाराज असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी 'आपण आपला राजकीय प्रवास थांबवत आहोत व नव्या पिढीसाठी काम करीत राहीन. घरी बसणार नाही', असे फेसबुकवर लिहिले आहे.
'रागात घेतलेले निर्णय असेच असतात. ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरवता येत नाही, तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्कं समजलंय', असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे, 'भाजपमध्ये जाऊनही आपला काँग्रेस विचार बदललेला नाही, हेच त्यांना या निमित्ताने सांगायचे असावे', असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.
ऐंशीच्या दशकात गुरुदास कामत, आनंद शर्मा यांच्या बरोबरीने युवक काँग्रेसमध्ये धडाडीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकांताताई या विधानसभेत निवडून आल्या होत्या. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर त्या त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत गेल्या. नांदेड हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवरही गेल्या व राज्यमंत्रीही झाल्या होत्या.
मोदीलाटेवर स्वार होण्याच्या नादात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकांनी भाजपचा रस्ता धरला. त्यात सूर्यकांता पाटीलही होत्या. मात्र, 'ज्या पक्षासाठी आपण सर्वस्व पणाला लावले, त्या पक्षात न्याय मिळाला नाही', अशी खंत त्यांनी त्यावेळी अनेकांकडे बोलून दाखवली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची इच्छा राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली होती. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद दिला गेला नव्हता, असे सूत्रांनी सांगितले.
'अनोख्या प्रांतात रमू शकत नाही'
'४३ वर्षे राजकारणात राहिले. ४०० रुपयांची साडी ४००० हजारांच्या थाटात नेसले, मिळेल ते काम केले. मात्र, आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोख्या प्रांतात माझ्यासारखी मनस्वी रमू शकत नाही', सूर्यकांता पाटील यांनी आपल्या भवनिक पोस्टमध्ये म्हटले आहे.