अ‍ॅपशहर

हक्काच्या अनुदानासाठी शिक्षक आंदोलन चिघळले

हक्काच्या अनुदान टप्प्यासाठी आठवडाभर लढणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा न ऐकणाऱ्या शिक्षणमंत्री व पोलिसांच्या विरोधात शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सोमवारी दुपारी ३वाजता सुमारे ५०० शिक्षकांनी आझाद मैदानातून मंत्रालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Times 23 Jan 2018, 5:28 am
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम agitation


हक्काच्या अनुदान टप्प्यासाठी आठवडाभर लढणाऱ्या शिक्षकांच्या व्यथा न ऐकणाऱ्या शिक्षणमंत्री व पोलिसांच्या विरोधात शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सोमवारी दुपारी ३वाजता सुमारे ५०० शिक्षकांनी आझाद मैदानातून मंत्रालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवून त्यांची शिक्षणमंत्र्यांशी भेट घडवून दिली.

या भेटीत तावडे यांच्याकडून निराशा झाल्याने हक्काचा पगार मिळणार की नाही, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला. हे आंदोलन सरकारने पेटवू नये अन्यथा शिक्षकांना रस्त्यावर उतरून टोकाची भूमिका घ्यावी लागेल. १६२८ शाळा व २४५२ वर्गतुकड्यांना जोपर्यंत १०० टक्के अनुदान मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आता मैदान सोडले जाणार नाही, अशी भूमिका विनाअनुदानित शाळा कृति समितीने घेतली आहे. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करताना शिष्टमंडळाने त्यांना अधिवेशानात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. मात्र तावडे यांनी 'मी एक टक्का वाढवून देणार नाही, चला द्या निवेदन,' असे म्हणून आमची बोळवण करण्याचा प्रयत्न केल्याचे समितीचे प्रशांत रेडीज यांनी सांगितले. के. पी.पाटील, बाळकृष्ण गावंडे, प्रशांत रेडीज, गुलाब पाल, पुंडलिक रहाटे, नाना पाटील व दीपक देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

मुंबई प्रांत (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती, मुंबई यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन धादांत खोटे आहे. समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात माझी भेट घेतली. त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले, त्यानुसार शिष्टमंडळातील प्रतिनिधींशी २० मिनिटे सविस्तर चर्चा केली. या चर्चेतील काही मुद्यांवर यापूर्वीही चर्चा करण्यात आली होती. अनुदानाच्या मुद्यांवर वित्त विभागाशी चर्चा सुरू आहे. शाळांना अनुदान देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत जो शासन निर्णय झाला, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.

विनोद तावडे, शिक्षणमंत्री

सरकार आम्हाला आमच्या मागणीनुसार व हक्कानुसार टप्पा अनुदान देत असेल तर स्वागत आहे. मग आंदोलन करायची गरज काय? सरकारने अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी. नुसती आश्वासने नको, ठोस काही हाती लागल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.

प्रशांत रेडीज, अध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृति समिती (मुंबई)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज