म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
भायखळा महिला तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिला अमानुष मारहाण करत तिची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन तुरुंग अधिकारी मनीषा पोखरकर यांच्यासह अन्य सहा महिला तुरुंग कर्मचाऱ्यांचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावले.
२४ जून २०१७ रोजी मंजुळाचा मृत्यू झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या सहाही आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज केले होते. मात्र, जामीन मिळाल्यास आरोपी या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे, असे म्हणत पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी जामीन मंजूर करण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. अखेरीस दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मनीषा पोखरकर, सुरेखा काकड, वसिमा शेख, आरती शिंगणे, बिंदू नायकोडे, शीतल शेगावकर व सुरेखा गुळवे या सर्वांचे अर्ज फेटाळत असल्याचा निर्णय न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावला. न्यायालयाचा सविस्तर निकाल नंतर उपलब्ध होणार आहे.