यावर्षी पावसाची झड जोरदार बसल्यामुळे परळ, लालबाग, चिंचपोकळी, भांडुप, नाहूर, कुर्ला, सांताक्रूझ, मरोळ, अंधेरी, क्रांतीनगर, वाशीनाका यांसारख्या परिसरामध्ये पाणी तुंबले. हे पाणी ओसरले असले, तरी मागे राहणारा चिखल-गाळ स्वच्छ करताना नागरिकांच्या नाकीनऊ आले. या तुंबलेल्या पाण्यामुळे संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, त्वचाविकार यांनी मुंबईकरांना घेरले. पाणी तुंबलेल्या जोगेश्वरी, गोरेगाव, मोतिलाल नगरमध्ये डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढले आहे. कुर्ला, एम वॉर्डमध्ये संसर्गजन्य तापाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पावसानंतर आरोग्य व्यवस्थेसमोर उभी राहिलेली आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यावर टाकलेला दृष्टिक्षेप...
...................
शर्मिला कलगुटकर
sharmila.kalgutkar@timesgroup.com
......................................
मुंबईकर फणफणले
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे आजारांचा फैलावही झपाट्याने झाल्याचा अनुभव अनेकांनी व्यक्त केला. ज्यांच्या घरामध्ये पाणी गेले होते, त्यातील अनेकांना हात-पाय दुखणे, त्वचारोग, संसर्गजन्य तापासह दम लागण्याचा त्रासही होत आहे, असे मोतिलाल नगरमधील रहिवाशांनी सांगितले. सांडपाण्यामुळे हा त्रास उद्भवल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे. दूषित पाण्यामध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे त्वचारोगाचा संसर्ग झाला आहे.
पाण्यातून संसर्ग
पाण्यातून होणाऱ्या संसर्गामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या आजारांचा प्रादुर्भावही वाढता आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध ठिकाणच्या नळांच्या जोडण्याची कामे पूर्ण न झाल्यामुळे दूषित पाण्याशी संबंध येऊन संसर्ग वाढत आहे. जून महिन्यामध्ये पावसाळ्याशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली होती. १ ते ३० जून २०१९च्या कालावधीदरम्यान मुंबईकरांना गॅस्ट्रोचा सर्वाधिक त्रास झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जूनमध्ये हेपेटायटिसच्या रुग्णांचीही शहरात अधिक नोंद झाली आहे. ७७७ रुग्णांनी गॅस्ट्रोवर पालिका रुग्णालयातून उपचार घेतले. गेल्यावर्षी जूनमध्ये काविळीच्या ९४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्याच कालावधीमध्ये मुंबईत २८२ रुग्णांची नोंद झाली. कुर्ला परिसरामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हेपेटायसिसच्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसते. या भागात एकूण ३०४ रुग्ण आढळले. २४ क्रमांकाच्या प्रभागामध्ये ६४३ रुग्णांची नोंद करण्यात आली. एल, एम आणि ई प्रभागामध्येही दूषित पाण्यातून संसर्ग झाल्यामुळे हेपेटायसिसचा जोर वाढता होता.
सूचनांकडे काणाडोळा
लेप्टोस्पायरोसिसच्या पाण्यातून होणाऱ्या प्रादुर्भावाबद्दल वारंवार सांगण्यात येत असले, तरीही सर्वसामान्यांकडून या सूचनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे आजाराचे निदान होऊन तो बरा होण्यास विलंब होतो. चाळी, मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये आरोग्यसल्ला ऐकून घेण्याची मानसकिता असली, तरी उच्च मध्यमवर्गीय वसाहतींमधून आरोग्याची काळजी पुरेशा प्रमाणात घेतली जात नाही, असा अनुभव आरोग्य कार्यकर्ते सांगतात.
लसीकरणाकडे दुर्लक्ष
लहान मुलांप्रमाणे फ्लूसंदर्भात लसीकरणाला प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळतो. स्वाइन फ्लूच्या लसीकरणालाही मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. पाणी साठलेल्या भागातही लसीकरणासंदर्भात गैरसमज आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण परवडत नसल्याचे रहिवासी सांगतात.
आरोग्याला प्राधान्य नाही
एखाद वर्षाचा अपवाद सोडता परळ, जोगेश्वरी, मोतिलाल नगर कुर्ला या भागामध्ये पाणी तुंबतेच. आर्थिक फटका बसल्यानंतर संसाराची पुन्हा जुळवाजुळव करताना रहिवाशांकडून आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, अशी तक्रारही आरोग्य यंत्रणांकडून पुढे येते.
०००००००००००००००००००००००००००
००००००००००००००००००००००००
योग्यवेळी काळजी घ्या
पावसाळा आला की, साथीच्या आजारांचा जोर वाढतो. यंदा कोणत्या आजारांचा प्रादुर्भाव अधिक आहे, या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी, याबद्दल सेंट जॉर्जेस रुगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले आहे.
..
या वर्षी आजारांचे स्वरूप कसे आहे?
मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये आजाराचे स्वरूप थोडे बदलते आहे. संसर्गजन्य तापाचा जोर वाढता आहे. डेंग्यूसदृश तापाचेही प्रमाण अधिक आहे. तापासह प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे, यावेळी मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या यांसारखी लक्षणे अधिक दिसून येतात.
यावर्षी पावसाळ्यामध्ये आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते का?
यावर्षी पावसाचा जोर मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अधिक होता. मुंबईतल्या अनेक ठिकाणी पाणी तुंबून राहिले. त्यातून सर्वसामान्यांना होणारा आजाराचा प्रादुर्भाव अधिक होता. पावसाच्या पाण्यात चाललल्यामुळे लेप्टोस्पायरोसिचा धोका वाढला. साचलेल्या पाण्यामधून चालल्याने हे आजार बळावल्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्तीस्थळे अधिक होती. पूरसदृश परिस्थितीमध्ये साथीचे आजार वेगाने वाढतात. त्या दृष्टीने विचार करावा लागतो.
साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कसा वाढतो?
साथीचे आजार नेमके कशामुळे होतात, याची माहिती अनेकांना नसते. ती माहिती करून घेणे गरजेचे असते. एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संसर्ग झाल्याने होणाऱ्या आजाराला साथीचे वा संसर्गजन्य आजार असे म्हटले जाते. पाणी, हवा, डास, अन्नातून होणाऱ्या प्रादुर्भावामुळे हे आजार पसरतात. डासांद्वारे पसरणाऱ्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया तर पाण्यामार्फत पसरणाऱ्या आजारांमध्ये कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ यांचा समावेश असतो. लेप्टो हा मातीच्या, पाण्याच्या प्रादुर्भावातून होऊ शकतो.
अनेकदा तापावर पहिले दोन दिवस घरीच उपचार केले जातात. ते योग्य आहे का?
तापाची बदलती लक्षणे पाहिली असता, कोणत्याही प्रकारचा आजार हा अंगावर काढू नये. ताप २४ ते ४८ तासांत उतरला नाही, तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे. त्यांनी सांगितलेल्या आरोग्य चाचण्या करून वैद्यकीय उपचार सुरू करावेत. रुग्णालय पातळीवर जनजागृती, डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे, आवश्यक आहे.
सर्वसामान्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
घरामध्ये पाणी साठवण्याच्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित बंद करावीत. त्यामध्ये फट असेल, तर डासांचा शिरकाव होऊ शकतो. मच्छरदाणीचा वापर करावा. घरात वा परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नये. नारळाच्या करवंट्या, प्लास्टिक डबे, पिशव्या तसेच टायर्स यांच्यामध्ये पाणी साठले, तर मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. साचलेल्या पाण्यातून चालत आल्यानंतर जलजन्य आजार होण्याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यादृष्टीनेही काळजी घ्यायला हवी.
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
०००००००००००००००००००००००००००००००००००००
आरोग्यविभागाचा कृती आराखडा
लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोसारखे आजार पावसाळ्यामध्ये झपाट्याने पसरतात. मुंबईमध्ये सव्वा कोटींची लोकसंख्या मर्यादित जागेमध्ये राहते. त्यामुळे या आजारांचा प्रादुर्भावही झपाट्याने होतो. साथीचे आजार रोखण्यासाठी मुख्य आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये एपिडेमिओलॉजी सेल ७ जूनपासून तयार करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी कोणत्या आजारांचा प्रादुर्भाव अधिक असू शकेल, याचाही अंदाज घेतला जातो. जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी खबदारी घेतली जाते. घनकचरा व्यवस्थापन विभागासह पाणी आणि व्हेटर्नरी विभागाशीही समन्वय साधण्यात येतो. वैद्यकीय तसेच अवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह खासगी वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांना जून-जुलैमध्ये प्रशिक्षण घेण्यात आले. आजारांचा उद्रेक होण्यापूर्वी औषधे, प्रतिजैविके, क्लोरिनच्या गोळ्या यांचा पुरेसा साठा करून ठेवण्यात येतो.
०००००००००००००००
आरोग्य शिबिरे
पालिकेच्या आरोग्य विभागाने दरमहा जवळपास १५० आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. त्यात ५८८९ मुंबईकरांना त्याचा वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले.
....
लेप्टोला आळा घालण्यासाठी
लेप्टोसंदर्भात नियमावलीनुसार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. दूषित पाण्याशी संपर्क आलेल्या ५४१७ व्यक्तींना सहा आठवड्यांपर्यंत केमोप्रोफिलॅक्सीस देण्यात आले. याद्वारे १ लाख ९२ हजार १५२ व्यक्तींना लेप्टोच्या प्रादुर्भावापासून संरक्षित करण्यात आले.
....
कावीळ, कॉलरा
संसर्गाची अधिक शक्यता असलेल्या जागा निश्चित करणे, घरोघरी सर्वेक्षण करून रुग्णशोध, ओआरएस पाकिटे, क्लोरिनच्या गोळ्यांचे वाटप, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाणी, पोषक आहार, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दूषित पाणी
- दूषित पाण्याच्या नमुन्यांची पालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणी
- फेरीवाल्यांची तपासणी, अस्वच्छ, दूषित व आरोग्यासाठी हानीकारक घटक नष्ट करणे, माहिती एफडीएला देणे
मलेरिया, डेंग्यु रोखण्यासाठी
वसाहतींमध्ये सर्वेक्षण करून आजारांचा प्रादुर्भाव करणारे घटक आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरण्यात आल्या. खासगी, सार्वजनिक रुग्णालयांतील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आजारांची माहिती पालिकेला देण्यासाठी खासगी लॅब, डॉक्टरांसोबत समन्वयावर भर, रॅपिड टेस्टिंग सुविधा, रुग्णालयांमध्ये एलआयझा पद्धतीची उपलब्धता, कस्तुरबा रुग्णालयामध्ये पीसीआर पद्धतीची उपलब्धता आदी उपाय करण्यात आले आहेत. पीसीओ विभागाकडून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न, गप्पी मासे पाळणे, अडगळीच्या वस्तू फेकुन देणे, पाणी न साठू देणे यावर भर.
स्वाइन फ्लू नियंत्रण
२४ ते ४८ तासांमध्ये फ्लूचा जोर कमी झाला नाही, तर संशयित रुग्णांसाठी स्वाइन फ्लू सदृश तापांची उपचारपद्धती अवलंबण्यात येते. आतापर्यंत २,७९४ रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहेत. स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना शोधण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जाते. गर्भवती तसेच उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास असलेल्या १,७२५ रुग्णांना एचवनएनवनचे लसीकरण करण्यात आले आहे. सतत हात धुणे, गर्दीची ठिकाणे टाळणे, शिंकताना व खोकताना तोंडावर हात ठेवणे, ताप-घसादुखी, डोकेदुखी, अंगदुखी असताना पूर्णपणे विश्रांती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
--रुग्णालयांमध्ये सुसज्जता -
पावसाळी आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्यनियमावलीचे निकषांचे पालन केले जाते. पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालये तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये तीन हजार बेडस् ठेवण्यात आले आहेत
..........
डासांना प्रतिबंध
कीटकनाशक विभागातर्फे मुंबईमध्ये विविध ठिकाणी पेस्ट कंट्रोल करण्यासोबत अनेक सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करण्यात येते. डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून ती नष्ट करण्यात येतात. मात्र घरांघरामध्ये जाऊन ही फवारणी करणे शक्य होत नाही. पावसाळ्यामध्ये पाणी साचणाऱ्या ठिकाणी पालिकेकडून पथके पाठवण्यात येतात. पाण्यामध्ये अधिक काळ राहणाऱ्या व्यक्तीला हे औषध दिले जाते. सातत्याने रुग्णसंपर्कात असलेल्या पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही औषधे दिली जातात.
...
पावसाळ्यामध्ये सर्वसामान्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियोजन केले जाते. पावसाळ्यातील आजार, साथींचा प्रादुर्भाव, पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेऊन औषधांची उपलब्धता, खाटांची संख्या, लक्षणे निदान तपासण्या असा सर्वकष विचार या नियोजनामध्ये अंतर्भूत असतो.
डॉ. पद्मजा केसकर, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी
...................