म. टा. प्रतिनिधी, मुंबई दीडशे वर्षांचा सुवर्ण इतिहास घेऊन मुंबई विद्यापीठाचा प्रवास चालू आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून आम्हाला अभिमानही वाटतो. मात्र मुंबई विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रचंड 'मागासलेला' असून स्पर्धेच्या युगात त्यात बदल व्हायला हवा. दहावी-बारावी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचीही तीच अवस्था आहे. यात बदल होणे आवश्यक आहे, अशी मागणी डहाणूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'मटा कट्टा'च्या व्यासपीठावरून केली. एकीकडे 'स्किल इंडिया'सारखे उपक्रम राबवत कौशल्यप्रधान भारताचे स्वप्न पाहताना, मुंबई विद्यापीठासारख्या अग्रगण्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा इतका खालावलेला आहे, ही गोष्ट लज्जास्पद असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांच्या खऱ्या-खोट्या 'पदव्यांच्या' गोष्टी आता समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या शिक्षण क्षेत्राशी निगडित धोरणांविषयी तरुण विद्यार्थी समाधानी आहेत का, त्यांच्या नेमक्या मागण्या काय, अशा विविध विषयांवर मुलांना बोलते करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे डहाणूकर कॉलेजमध्ये 'मटा कट्टा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाच्या मागे पडलेल्या अभ्यासक्रमाबद्दल बोलताना दिपंती साळवी म्हणाली, 'अलिकडे विद्यार्थ्यांना पदवीनंतरही वेगळे स्पेशलायजेशन करावेच लागते. ही कौशल्ये कॉलेजच्या काळातच अंगवळणी पडल्यास विद्यार्थ्यांना त्याचा योग्य वेळी फायदा होईल.' तर शेफाली मगदूम म्हणते, 'बारावीनंतर बोर्डाच्या अभ्यासक्रमाच्या जोरावर नीट, जेईईच्या परीक्षांना सामोरे जाता येत नाही. अशावेळी नाईलाजास्तव खासगी क्लासची वाट पकडावी लागते. त्यांची मनमानी निमूट सहन करावी लागते. त्यामुळे बारावीचा अभ्यासक्रम जेईई, नीटसारख्या प्रवेश परीक्षांतील काठिण्य पातळीला सक्षमपणे सामोरे जाण्याच्या दृष्टीने बदलणे ही काळाची गरज आहे.' मुंबईसारख्या महानगरांत आजही एमबीबीएस आणि इंजिनीअरिंगला पालकांकडून झुकते माप दिले जाते. मात्र या पलिकडेही अशी अनेक करिअर क्षेत्रे आहेत, याबद्दल मुलांना माहिती दिलीच जात नाही. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांच्या निकालात मुंबईतील विद्यार्थ्यांची नावे 'शोधावी' लागतात. यामध्ये फक्त पालकांची नाही, तर आपल्या शिक्षणपद्धतीचीही चूक आहे. याबाबत पवन लब्दे म्हणतो, 'लहापणापासून फक्त अभ्यास करा, परीक्षा द्या, त्यातही इंजिनीअर किंवा डॉक्टर व्हा, हेच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. अलिकडे मतप्रवाह थोडा बदलू लागला असला, तरी कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रांना म्हणावे तसे महत्त्व दिले जात नाही. निवडीची मुभा, प्रोत्साहन, सहकार्य मिळाले, तर विद्यार्थी आवडीच्या क्षेत्रात घोडदौड करू शकतील, यावर पालकांना विचार करायला हवा.' तर सलोनी बोभाटे म्हणते, 'दहावीला जास्त टक्के म्हणजे विज्ञान, त्याहून कमी टक्के म्हणजे वाणिज्य आणि सर्वात कमी टक्के म्हणजे कलाशाखा असे वर्गीकरण आपल्या मानसिकतेमध्ये रूळलेले आहे. मात्र आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिल्यास विद्यार्थी योग्य वेळी योग्य वाट पकडतात. आपल्या शिक्षण पद्धतीने ही मानसिकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही रुजवायला हवी.' या चर्चेमध्ये प्राजक्ता होडवे, हर्षाली घोणे, समर गोरूले, ऋषिकेश मोरे, अनुराधा आर्कडे यांनीही भाग घेतला. कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर डोके यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षणाचे खाजगीकरण का? शाळेपासूनच मुलांना ट्युशनची सवय लावली जाते. कॉलेजमध्येही ती कायम राहते. दहावी, बारावी, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा या अतिरिक्त वलयप्राप्त झालेल्या टप्प्यांसाठी खासगी शिकवणी अनिवार्य असते, असा समज आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती किती गांभीर्याने घेतली जाते? या पार्श्वभूमीवर कॉलेजचे महत्त्व कमी होत चालले आहे, ही खंत आर्या रामटेके हिने व्यक्त केली. प्राध्यापकही विद्यार्थी शिकवणीला जातात हे गृहीत धरतात आणि परीक्षेपलीकडे जाऊन गुण दूर करत प्रत्यक्ष ज्ञान देणे इच्छा असूनही राहून जाते. जातीयतेचा पडदा शाळेत असेपर्यंत आपल्या बाजूला बसणारा मुलगा कुठल्या जातीचा आहे, हे आपल्याला माहीतही नसते. मात्र कॉलेजप्रवेशावेळी या जातीयतेच्या राजकारणाशी परिचय होतो. आरक्षित जागा, फी माफी, विशेष शिष्यवृत्त्यांचे गणित समजून घेताना बऱ्याचदा ऐकीव माहितीआधारे विद्यार्थी गफलत करतात. आरक्षण या संकल्पनेच्या मुळाशी हात घालत आजच्या घडीला त्याचा योग्य वापर करून घेण्यासाठी सरकारने विशेष लक्ष घालायला हवे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (संकलन : प्रथमेश राणे, गौरी आंबेडकर)
अभ्यासक्रम व्हावेत अद्ययावत
म टा प्रतिनिधी, मुंबईदीडशे वर्षांचा सुवर्ण इतिहास घेऊन मुंबई विद्यापीठाचा प्रवास चालू आहे विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून आम्हाला अभिमानही वाटतो...
MT 19 Apr 2019, 4:00 am