म. टा. प्रतिनिधी, मुंबई
राफेल विमान खरेदी सौद्यातील कथित भ्रष्टाचार, पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमती, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी या प्रश्नावर मोदी सरकारच्या विरोधात लोकांमध्ये संताप असून, हा राग व्यक्त करण्यासाठी येत्या सोमवारी ८ ऑक्टोबरला 'भाजप सरकार हटाओ, संविधान बचाओ' या मागणीसाठी कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि युवक मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी बुधवारी येथे दिली.
पेट्रोल -डिझेल इंधन तसेच स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या वाढत्या दरांच्या तसेच महागाईच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे ८ ऑक्टोबरला भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यातून कार्यकर्ते व सामान्य माणूस सहभागी होईल, असे रेड्डी म्हणाले. मोदी सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. बेरोजगारांना दोन कोटी नोकऱ्यांचीही घोषणा हवेत विरली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाला भाव देण्याचा शब्द सरकारने पाळला नाही. त्याशिवाय कंत्राटी पद्धती, सामाजिक सुरक्षा, धार्मिक विद्वेश असे असंख्य प्रश्न आहेत, असे रेड्डी यांचे म्हणणे आहे.
नोटाबंदीमुळे लहान व्यापारी देशोधडीला लागला आहे. विमा व रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा केल्यामुळे लहान व्यावसायिक संकटात सापडला आहे. सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले भाजप सरकार हटविण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रेड्डी म्हणाले.