म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
जी.टी. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४५ वर्षीय रघुनाथ भाऊ कोळेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कोळेकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कोळेकर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, डॉक्टरांनी वेळीच वैद्यकीय उपचार सुरू न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
गिरगावच्या फणसवाडीत राहणाऱ्या रघुनाथ कोळेकर यांच्या छातीत शुक्रवार सकाळपासून दुखत होते. त्यामुळे त्यांना सकाळी साडे आठ वाजता जीटी रुग्णालयात नेण्यात आले. 'काकांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, छातीत दुखत असूनही डॉक्टरांनी काकांना दोन तास थांबवून ठेवले', असे कोळेकर यांचे पुतणे शशी कोळेकर यांनी सांगितले. 'प्राथमिक उपचारांनंतरही छातीत दुखत असल्याची तक्रार काका करत होते. काकांचा ईसीजी काढल्यानंतर तो नॉर्मल असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवा, असे सांगत आम्ही डॉक्टरांच्या मागे फिरत होतो. तरीही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. इथे व्यवस्थित उपचार मिळत नसतील तर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, अशी विनंतीही केली होती पण, रुग्णालयाने त्यास दाद दिली नाही', असा दावाही शशी यांनी केला.
कारवाईचे आश्वासन?
शवविच्छेदन अहवालानंतर सत्य बाहेर येईल, असाही दावा कोळेकर यांच्या नातेवाईकांनी केला असून, मृत्यूस जबाबदार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला होता. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही शशी यांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात डॉ. मुकुंद तायडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
जी.टी. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४५ वर्षीय रघुनाथ भाऊ कोळेकर यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कोळेकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. कोळेकर यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, डॉक्टरांनी वेळीच वैद्यकीय उपचार सुरू न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
गिरगावच्या फणसवाडीत राहणाऱ्या रघुनाथ कोळेकर यांच्या छातीत शुक्रवार सकाळपासून दुखत होते. त्यामुळे त्यांना सकाळी साडे आठ वाजता जीटी रुग्णालयात नेण्यात आले. 'काकांना हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र, छातीत दुखत असूनही डॉक्टरांनी काकांना दोन तास थांबवून ठेवले', असे कोळेकर यांचे पुतणे शशी कोळेकर यांनी सांगितले. 'प्राथमिक उपचारांनंतरही छातीत दुखत असल्याची तक्रार काका करत होते. काकांचा ईसीजी काढल्यानंतर तो नॉर्मल असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवा, असे सांगत आम्ही डॉक्टरांच्या मागे फिरत होतो. तरीही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. इथे व्यवस्थित उपचार मिळत नसतील तर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो, अशी विनंतीही केली होती पण, रुग्णालयाने त्यास दाद दिली नाही', असा दावाही शशी यांनी केला.
कारवाईचे आश्वासन?
शवविच्छेदन अहवालानंतर सत्य बाहेर येईल, असाही दावा कोळेकर यांच्या नातेवाईकांनी केला असून, मृत्यूस जबाबदार डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्राही त्यांनी घेतला होता. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही शशी यांनी सांगितले. मात्र, यासंदर्भात डॉ. मुकुंद तायडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.