म. टा. प्रतिनिधी, मुंबई
करोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांचा 'लॉकडाऊन' जाहीर केला आहे. नागरिकांनी घरी राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच 'आपणच आहोत आपले रक्षक, नका होऊ स्वतःचे भक्षक', अशी शीघ्र कविताही त्यांनी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी एक हजार ७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरीबांना दिलासा दिला आहे. या निर्णयाचे आठवले यांनी स्वागत केले. कर्जाचे मासिक हफ्ते भरण्यास बँकांनी मार्च आणि एप्रिलची सवलत द्यावी आणि खासगी उद्योजकांनी 'सीएसआर' फंडातून गरीबांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
...
जयंती 'लॉकडाऊन'नंतरच
'लॉकडाऊन'मुळे सध्या सार्वजनिक उत्सव साजरे करता येणार नाहीत. त्यामुळे १४ एप्रिलला येणारी बाबासाहेब आंबेडकर जयंती घरी थांबूनच साजरी करू या. करोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतर आपण जयंती साजरी करू, असे आवाहन आठवले यांनी केले.