- अतिरिक्त वेळ खर्ची पडत असल्याने प्रवाशी त्रस्त
- कायमस्वरूपी तोडगा आवश्यक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
पावसाळ्यात 'मुंबईत खड्डे की खड्ड्यात मुंबई' अशी परिस्थिती मुंबईकरांनी अनुभवल्यानंतर किमान दिवाळी येईपर्यंत तरी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होतील, अशी आशा बाळगणाऱ्या सर्वच मुंबईकरांची घोर निराशा झाली आहे. विभागांतर्गत रस्ते सोडाच, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांवर असलेल्या खड्ड्यांमुळे देखील नागरिक त्रस्त आहेत. संबंधित मार्गांवर काही भागांत मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीचा त्रास नित्याचा झाला आहे.
या दोन्ही द्रुतगती मार्गांवरून लाखो मुंबईकर नित्यनेमाने प्रवास करतात. मात्र या मार्गांवरील छोटे-मोठे खड्डे, मेट्रो कामांमुळे झालेले अरुंद रस्ते आणि वाहतूककोंडी यामुळे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या वेळेतील तब्बल दीड ते दोन तास अतिरिक्त खर्च होत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर खार, सांताक्रूझ उड्डाणपूल, अंधेरीच्या पुढे थेट दहिसर गाठेपर्यंत तर पूर्व द्रुतगती मार्गावर कामगार जंक्शन, परळ जंक्शन, जेव्हीएलआर तसेच मुलुंड लिंक रोड अशा भागांमध्ये प्रवाशांची अक्षरशः दमछाक होते आहे. या वाहतूककोंडीत अडकल्याने लेटमार्क लागल्याच्या तक्रारी नियमित प्रवाशांकडून येत आहेत. या दोन्ही मार्गांची जबाबदारी एमएमआरडीएच्या अखत्यारित येत असल्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.
नोकरीनिमित्त डोंबिवलीच्या पलावा येथून पूर्व द्रुतगती मार्गाने पवई आणि तेथून जेव्हीएलआर मार्गे पश्चिम द्रुतगती मार्गावर येणारे संदीप जाधव म्हणतात, 'याआधी फार तर दीड तासात ऑफिस गाठायचो. आता मात्र आणखी एका तासाची भर पडली आहे. त्यात खड्ड्यांमुळे शरीरातील हाडे खिळखिळी होतात ती वेगळीच. खड्डे बुजवणे आणि गर्दीचे उत्तम नियोजन जोवर होत नाही तोवर या त्रासातून मुक्ती नाही.'
वाहचालक-मालकांचे आर्थिक नुकसान
विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी अनेक खासगी गाड्या या मार्गांवरून धावतात. या खासगी गाड्यांवर अनेकांचा चरितार्थ चालतो. मात्र या वाहतुककोंडीमुळे कर्मचाऱ्यांना कंपनीपर्यंत पोहोचवण्यास उशीर झाल्यास चक्क गाड्यांना लेटमार्क लावला जात आहे. आणि हा लेटमार्क लागल्यानंतर प्रत्येक ट्रीपमागे तब्बल १० ते १२ टक्के कापले जात असल्याची माहिती हर्षद सुतार यांच्याकडून मिळाली.
..
मी नेहमी अंधेरी ते ऐरोली प्रवास करतो. मिलिंद नगर, पवई या भागांत खड्ड्यांचा प्रचंड त्रास जाणवतो. त्यामुळे दीड ते दोन किमी वाहनांच्या रांगा लागतात. मेट्रोचे काम आणि सिप्झ येथे खासगी गाड्या विनाकारण उभ्या राहत असल्याने वाहतूककोंडीत भर पडते. यामुळे अवघ्या पाऊण तासाचा प्रवास दोन ते अडीच तासांचा होतो.
- विशाल कदम, प्रवासी
या दोन्ही द्रुतगती मार्गांची जबादारी आमच्या अखत्यारित येते. या मार्गांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरवर्षी ठराविक निधीची तरतूद करण्यात येते. त्यानुसार पावसाळा संपला की या मार्गांची डागडुजी केली जाते. सध्या पावसाची ये-जा सुरू असल्याने कामास सुरुवात झालेली नाही. दोन्ही मार्गांवरील खड्डे मोजदाद सुरू असून लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल.
- दिलीप कवटकर, प्रकल्प महासंचालक (जनसंपर्क) एमएमआरडीए