म. टा. प्रतिनिधी, मुंबई
अयोध्येत राम मंदिराचे निर्माण आणि मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना यांच्यात भक्कम सेतू निर्माण झाला आहे. त्यामुळेच विधानसभेतील उपाध्यक्षपद शिवसेनेचे पारनेरचे आमदार विजय औटी यांना बिनविरोध मिळाले, पण शिवसेनेला आणखी एक महत्त्वाचे विधान परिषदेचे रिक्त असलेले उपसभापतिपद देखील मिळणार होते. त्यासाठी शिवसेनेने डॉ. नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली होती. मात्र उपसभापतिपदाची निवडणूक जाहीर न होण्यास भाजप, राष्ट्रवादीच्या खेळीसह शिवसेनेतील अंतर्गत वादाची किनार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
विधान परिषदेचे उपसभापतिपद यापूर्वी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी भूषविले होते. पण पक्षाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे ठाकरे यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा गेल्या अधिवेशनात दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. गेल्या काही महिन्यांतील शिवसेना-भाजप यांच्यातील तणावाचे संबंध आता पूर्णपणे निवळले असून, आगामी निवडणुकीत भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा धनुष्यबाण यांची सत्ता असेल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन काळात दिले होते. त्याची परिणती म्हणून विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेचे औटी यांना मिळाले. तसेच उपसभापतिपदसुद्धा सेनेला देण्याचा शब्द भाजपने दिला असल्याचे बोलले जाते.
उपसभापतिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव मुख्यमंत्र्यांकडे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व अन्य मंत्र्यांमार्फत कळविले होते. तथापि, पश्चिम उपनगरातील सेनेच्या एका आमदाराने सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या एका वादग्रस्त आमदाराचे निलंबन रद्द करण्याचे प्रकरण उकरून काढून राष्ट्रवादीला मदत केल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे उपसभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम काही जाहीर झालाच नाही. आता शिवसेनेला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत उपसभापतिपदासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विधान परिषदेत सध्या दोन्ही काँग्रेसचे प्रत्येकी १७ असे एकूण ३४ संख्याबळ आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीचेही संख्याबळ ३४ आहे. अपक्ष सहा आमदारांसह अन्य पक्षांचे १० सदस्य आहेत. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार यात निवडून आणता आला असता, असे भाजपच्या गोटात बोलले जात आहे.