अ‍ॅपशहर

तापमानात घट दोन दिवसांनंतरच

शनिवारचा दिवस काहिलीची गेल्यानंतर आज, रविवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2019, 5:11 am
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम summer


शनिवारचा दिवस काहिलीची गेल्यानंतर आज, रविवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर सोमवारी किमान तापमानात आणखी वाढ होऊन सांताक्रूझ येथे हे तापमान २५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

'राजस्थानजवळ निर्माण झालेल्या चक्रीय वात स्थितीमुळे राज्याच्या किनारपट्टीवरील शहरांच्या तापमानामध्ये वाढ दिसत आहे', अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. या तापमानात दोन दिवसांनी किंचित घट अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. मुंबईमध्ये सन २०१८च्या एप्रिलमध्ये सर्वाधिक ३६.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती तर त्या आधीच्या वर्षी सन २०१७ मध्ये ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. गेल्या दहा वर्षांमध्ये एप्रिलमधील तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंतही पोहोचला आहे. गेल्या सात वर्षांत एप्रिलमधील सर्वाधिक कमाल तापमान हे एप्रिलच्या शेवटच्या पंधरवड्यात नोंदले गेले आहे. त्या आधी ऋतुबदलाच्या वेळी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा चढला आहे. उपलब्ध नोंदीनुसार आतापर्यंतचे एप्रिलमधील सर्वाधिक कमाल तापमान सन १९५२ मध्ये ४२.२ अंश सेल्सिअस इतके होते.

चंद्रपुरात ४४.२ अंश

सध्या राज्याच्या अंतर्भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. मात्र हे तापमान त्या-त्या भागातील सरासरीपेक्षा २ ते ४ अंशांनी जास्त आहे. शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे ४४.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही विभागात पारा ४१ अंशांच्या पलीकडे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज