अ‍ॅपशहर

विद्यार्थ्यांअभावी ४१ कॉलेज ‘बंद’ची वेळ

मुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून काही कॉलेजांमधील रिक्त राहणाऱ्या...

Maharashtra Times 17 May 2018, 7:06 am
राज्यातील ४१ कॉलेज प्रशासनांचा 'डीटीई'कडे प्रस्ताव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dte


sourabh.sharma1@timesgroup.com

@sourabhsMT

मुंबई : मुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून काही कॉलेजांमधील रिक्त राहणाऱ्या जागांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या ४१ कॉलेज प्रशासनांनी कॉलेज बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाकडे (डीटीई) सादर केल्याची माहिती हाती आली आहे. यात पदवी अभ्यासक्रमाच्या २६, तर पदविका अभ्यासक्रमाच्या १५ कॉलेजांचा समावेश आहे. या प्रस्तावांपैकी काही प्रस्ताव आता डीटीईकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. सरकारकडून हे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे पाठविले जाणार आहेत.

मुंबईसह राज्यातील तंत्रशिक्षणाचे धडे देणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांचा खालावत चाललेला दर्जा उंचावण्याचे तंत्र अनेक कॉलेजांना अद्याप जमलेले नाही. बहुतांश कॉलेजांमध्ये पायाभूत सुविधा पुरविताना देखील तारेवरची कसरत करावी लागत असल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. इंजिनीअरिंग कॉलेजांप्रमाणे आर्किटेक्चर, एमबीएचे शिक्षण देणाऱ्या मॅनेजमेंट कॉलेजांमध्येही हे प्रमाण वाढल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहे. अनेक कॉलेज प्रशासनांनी आर्थिक बजेट सांभाळणे कठीण जात असल्याने कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, अनेक कॉलेजांनी खासगी विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळविल्याने सध्या सुरू असलेले कॉलेज बंद करण्याची मागणी डीटीईकडे केल्याचे कळते. ज्यात पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण २६ कॉलेजांनी, तर पदविका अभ्यासक्रमाच्या १५ कॉलेजांनी बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव डीटीईकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापैकी डीटीईने पदवी अभ्यासक्रमाच्या १४, तर पदविका अभ्यासक्रमाच्या ७ कॉलेजांचे प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे सादर केल्याचे समजते.

राज्य सरकारकडे प्राप्त झालेले हे अर्ज आता अंतिम मान्यतेसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडे पाठविण्यात येणार आहेत. या अर्जांची योग्य ती छाननी करून त्यानंतर अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डीटीईचे संचालक डॉ. अभय वाघ म्हणाले, 'कॉलेजांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी करून आम्ही योग्य ते अर्ज राज्य सरकारकडे सादर केले आहेत. यंदा इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या कोणत्याही नव्या कॉलेजांना मान्यता देऊ नये, असा प्रस्तावही आम्ही राज्य सरकारकडे पाठविला आहे.'

नामांकित कॉलेजांचाही समावेश

कॉलेज बंद करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जांमध्ये मुंबई आणि पुण्यातील अनेक नामांकित कॉलेजांचा देखील समावेश आहे. या नामांकित कॉलेजांनी आता खासगी विद्यापीठ म्हणून काम करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांनी हे कॉलेज बंद करण्यासाठी अर्ज केल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद एकूण किती संस्थांना कॉलेज बंद करण्याची मान्यता देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज