लसीकरणाचे ३५ टक्के उद्दिष्ट्य साध्य
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
संपूर्ण राज्यभर आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण माहिमेत गेल्या दहा दिवसांत एक कोटी आठ लाख मुलांना ही लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे ३५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे.
...........
भंडारा जिल्ह्याची आघाडी
जिल्ह्यातील साठ टक्के मुलांचे लसीकरण पूर्ण करून भंडारा जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटांतील १६ लाख २७ हजार मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. ५ ते१० वर्षे वयोगटातील ४१ लाख ५५ हजार आणि १० ते १५ वर्षे वयोगटातील ५१ लाख ६ हजार मुलांचे लसीकरण करण्यात आले. मोहीम सुरू झाल्याच्या दहा दिवसांत एकूण राज्याच्या अपेक्षित लाभार्थ्यांपैकी ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत १०० टक्के गोवर रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
.............
यांची चांगली कामगिरी
राज्यातील एकूण शाळांपैकी ९६ हजार शाळांमध्ये लसीकरण सत्र यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. या मोहिमेत आतापर्यंत खालील जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
भंडारा ६० टक्के
सिंधुदुर्ग ५७ टक्के
गडचिरोली ५२ टक्के,
कोल्हापूर ५० टक्के
यवतमाळ ४९ टक्के
...........
पालिकांची समाधानकारक कामगिरी
नवी मुंबई ४६ टक्के,
वसई-विरार ४२ टक्के
धुळे ४२ टक्के
कोल्हापूर ४१ टक्के
............
मदरशांचा आदर्श
कडेगाव सांगली येथील मदरशांमधील १०० टक्के मुलांनी लसीकरण करून घेतले असून राज्यभरात ज्या ठिकाणी लसीकरणाबाबत गैरसमजातून नकार देण्यात आला अशा शाळांमधूनही आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.
......
'पालकांनी घाबरून जाऊ नये'
काही ठिकाणी लसीकरणानंतर मुला-मुलींना किरकोळ स्वरूपाचा त्रास जाणवला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रथमोपचार करून खबरदारीचा उपाय म्हणून काही मुलांना दवाखान्यात दाखल करून घेतले, त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते मात्र काही तासानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले. पालकांनी घाबरून न जाता मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.